
Nagar News : ‘‘मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत आरक्षण (Maratha Reservation) द्या किंवा घटना दुरुस्ती करा. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली पुनर्याचिकादेखील फेटाळली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा.
यासाठी नवी दिल्ली येथे ७ जूनला मराठा महासंघाचे आंदोलन केले जाणार आहे,’’ असे मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील यांनी सांगितले. घटना दुरुस्ती करून ५० टक्क्यांच्या आत आरक्षण देण्याची मागणी या वेळी करण्यात येणार आहे.
मुंबई येथे शुक्रवारी (ता. २२) मराठा महासंघाची बैठक पार पडली. या वेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, संतोष नानवटे, श्रीरंग बरगे, रणजित जगताप, परशुराम कासुळे, अॅड. गजेंद्र भोसले, शशिकांत पिसाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संभाजी दहातोंडे म्हणाले, की केंद्र सरकारच्या स्तरावर महाराष्ट्रातील मराठा समाज, हरियानातील जाट समाज, राजस्थानातील राजपूत समाज तसेच मणियार समाज, पटेल समाज, काही अंशी कुर्मी समाज व इतर आरक्षणापासून वंचित राहिलेला समाजालाही आरक्षणाचा फायदा मिळावा हीच आमची भूमिका आहे.
ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्यास विलंब लागणार असेल, तर धोरणात बदल करून आरक्षणापासून वंचित असलेल्या मराठा समाजासह देशातील सर्व वंचित समाज घटकांना नोकरी, शिक्षणामध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा महासंघाने केली आहे.
५० टक्क्यांच्या आत आरक्षण असले पाहिजे, अशी जनभावना मराठा महासंघाची आहे. तरच ते सुप्रिम कोर्टात टिकेल किंवा घटना दुरुस्ती करावी. सततची आंदोलने, मोर्चे, बंद याच्या अति वापरामुळे आज सामान्य मराठा समाजातील कार्यकर्ते चळवळीपासून दूर होत आहेत. दिल्लीतील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून मराठा समाज बांधव जाणार आहेत, असेही ते म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.