
Ratnagiri News : मच्छीमारांच्या प्रगतीत नियमांची बाधा येत आहे, हे लक्षात आले आहे. त्यांच्या समस्या नक्कीच सोडवणार आहे. लवकरच केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील राज्यांचे मत्स्य मंत्री आणि मत्स्य विभागाचे अधिकारी यांची बैठक बोलावणार आहे. त्यामध्ये चर्चा करून समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासन केंद्रीय मत्स्य मंत्री परशोत्तम रुपाला यांनी दिले.
रत्नागिरीतील स्वा. सावरकर नाट्यगृहात आयोजित सागर परिक्रमा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री उदय सामंत, विभागाचे सचिव अतुल पाटणे, पंकजकुमार, राम कुमार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले, की सागर परिक्रमाच्या निमित्ताने कोकणातील लोकांना भेटण्याची संधी मिळाली. गेले दोन दिवस उद्योगमंत्री उदय सामंत हे माझे पालक म्हणून दौऱ्यात आहेत.
गुजरातमधील मांडवा येथून परिक्रमा सुरू झाली. महाराष्ट्रात दौऱ्याचे चांगले स्वागत झाले, त्यामुळे पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली आहे. सिंधुदुर्गात जाणार होतो पण मंत्री नारायण राणे व्यग्र असल्यामुळे दौरा अर्धवट सोडावा लागत आहे, मात्र भविष्यात तो पूर्ण करणार आहे.
मत्स्य विभागात येणाऱ्या समस्या अधिकाऱ्यांनी मांडल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे मंत्री असल्यामुळे प्रश्न सोडविणे शक्य आहे.
मिरकरवाडा येथील मच्छीमारांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. एका महिलेने समुद्र शेवाळासंदर्भात केलेल्या प्रयोगाची माहिती दिली. भविष्यात मत्स्य विभागाकडून समुद्र शेवाळ प्रकल्प राबविण्यासाठी पावले उचलणार आहे.
पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून त्याला प्रोत्साहन दिले जाईल. महिला मच्छीमारांनी पुढे येऊन शासनाच्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. केंद्र शासनाच्या अनेक योजनांमध्ये महिलांसाठी दहा टक्के अधिक अनुदान मिळते. या माध्यमातून आपला मच्छीमारी व्यावसाय वाढवावा.
ते म्हणाले, की समुद्रातून प्रवास करत मी वेलदूर, मिरकरवाडा येथे भेटी दिल्या आहेत. जाकिमिऱ्या येथील लोकांनी समस्या मांडल्या आहेत. हा दोन दिवसांचा दौरा सकारात्मक झाला. येथील पायाभूत सुविधांची माहिती घेतली आहे. मच्छीमारांच्या प्रगतीत नियमांची बाधा येत आहे, हे माझ्या लक्षात आले आहे.
त्यांच्या समस्यांचे समाधान नक्कीच करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी भविष्य जाणूनच मत्स्य विभागाचे वेगळे मंत्रालय तयार केले आणि त्याला पुरेसा निधी दिला आहे. कायद्यात बदल करण्याची त्यांची इच्छा आहे.
मिरकरवाडा येथे मच्छीमारांनी मांडलेले प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच दिल्लीत दोन दिवसांची बैठक बोलावणार आहे. त्यामध्ये चर्चा करून समस्या सोडवल्या जातील. रत्नागिरीतील पर्ससिनेटवाल्यांनी किनाऱ्यावर येण्यासाठी मच्छीमारी बोट दिली होती. त्यांचे प्रश्न मी नक्कीच सोडवेन.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.