उस्मानाबाद ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी शेतकऱ्यांच्या हक्काचा दोन वर्षांपूर्वीचा रखडलेला पीक विमा (Crop Insurance) द्यावा व ओला दुष्काळ (Weight Drought) जाहीर करावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. शुक्रवारी (ता. २८) त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत आपण माघार घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. दुसरीकडे त्यांच्या आंदोलनाला शेतकऱ्यांतूनही मोठा पाठिंबा मिळतो आहे.
आमदार पाटील यांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. दररोज त्यांना मिळणारा पाठिंबा देखील वाढत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांची प्रकृती खालावत चालल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे. त्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा देखील दिला आहे. त्यामुळे सुरु असलेल्या उपोषणाला कोणत्याही क्षणी हिंसक वळण लागण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. जिल्ह्यात सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय सततच्या पावसाने उरल्या सुरल्या पिकांनाही विविध रोगाने ग्रासले आहे. या परिस्थितीत शेतकरी अडचणीत आला असून, दोन वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा आणि नुकसान भरपाई त्वरित द्यावी.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २०२० मधील पीकविम्याची ५३१ कोटी रुपये जिल्ह्यातील तीन लाख ५७ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीन आठवड्यात जमा करण्याचे बंधन होते, असे असतानाही अद्यापपर्यंत पीकविमा जमा झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धुडकावत फक्त न्यायालयात जमा केलेल्या २०० कोटीवर प्रशासन बोळवण करत असल्याचे दिसून येत आहे, हा पीक विमा जमा होत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा पवित्रा आमदार पाटील यांनी घेतला आहे.
प्रकृती खालावली, पण उपचारास नकार
शुक्रवारी (ता.२८) उपोषणाचा पाचवा दिवस असून, प्रकृती खालावत जात असल्याने त्यांना उपचाराची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पाटील यांनी मात्र उपचार घेण्यास विरोध केला असून, माझ्यावर बळाचा वापर करण्यापेक्षा सरकारने कंपनीकडून पैसे वसुल करण्यासाठी बळ वापरावे, असे प्रतिआव्हान दिले आहे.
समर्थन वाढू लागले
पाटील यांना सत्ताधारी पक्ष सोडून इतर विविध राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. शिवाय समर्थन दर्शविण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतःला गाडून घेतले आहे. पाडोळी, सारोळा येथील शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.