
Nagar News नगर : श्रीगोंदा व कर्जत तालुक्यांतील द्राक्ष बागायतदारांना व्यापाऱ्यांनी तब्बल सव्वा कोटी रुपयांना गंडा घातला आहे. दीड महिन्यापूर्वी द्राक्ष (Grape) घेऊन गेल्यानंतर ‘चार-पाच दिवसांत पैसे देतो,’ असे सांगणाऱ्या व्यापाऱ्यांचे आठ दिवसांपासून मोबाईल बंद आहेत. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंद्यासह, बेलवंडी, हंगेवाडी, बोरी, पारगाव सुद्रिकसह कर्जत तालुक्यातील राशीन व रुईगव्हाण येथील २२ शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. मार्च व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाशिक व मुंबई येथील व्यापाऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या द्राक्षांचा सौदा केला.
माल घेऊन गेल्यावर चार ते पाच दिवसांत पैसे देण्याचे ठरले. मात्र, दीड महिना होत आला तरीही व्यापारी पैसे देत नव्हते. शेतकऱ्यांनी जास्त तगादा लावल्यावर व्यापारी मोबाईल बंद करून गायब झाले.
त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्रितरीत्या शुक्रवारी (ता. ५) नगरचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत संबंधित व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर श्री. ओला यांनी श्रीगोंदे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी दिली.
या भागात द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. व्यापारी दर वर्षी शेतात सौदा करून द्राक्षे घेऊन जातात. यंदाही त्यांनी द्राक्षे नेली. मात्र पैसे दिले नसल्याची स्थिती आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.