
नगर ः सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यातील सततचा पाऊस, अतिवृष्टीने (Heavy Rain) नगर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीत (Crop Damage) सर्वाधिक फटका सोयाबीन (Soybean Crop Damage), कापसाला (Cotton Crop Damage) बसला आहे. कापसाचे १ लाख ४५ हजार तर सोयाबीनचे १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे प्रशासनाच्या अंतिम अहवालात ते स्पष्ट झाले. यंदा खरीप कांद्याची लागवड (Onion Cultivation) कमी झाली होती, त्यातही कांदा व रब्बीसाठी टाकलेल्या रोपांचे मिळून सुमारे ३६ हजार हेक्टरवर नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगर जिल्ह्यात यंदा सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत सततचा पाऊस व अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. २१०० गावांतील सात लाख ४४ हजार ९३८ शेतकऱ्यांच्या ४ लाख ४१ हजार ११९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी ८७७ कोटी २० लाखांची गरज असल्याचे प्रशासनाने अंतिम अहवालात नमूद केले असून, शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. झालेल्या नुकसानीत पीकनिहाय स्थिती पाहिली तर सलग चार वर्षांपासून कापूस आणि सोयाबीन उत्पादकांचे नुकसान होत आहे.
यंदा झालेल्या नुकसानीतही कापूस आणि सोयाबीनचेच कमालीचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोयाबीनचे साधारणपणे एकरी आठ ते दहा क्विंटलचे उत्पादन निघते, यंदा मात्र केवळ दोन ते तीन क्विंटलवर उत्पादन निघाले. कापसाचे एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादन निघाले, यंदा मात्र तीन ते चार क्विंटलच्या आतच उत्पादन निघाले आहे.
कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना यंदा नुकसानीपोटी दोन हजार कोटींपेक्षा अधिक फटका बसल्याचे जाणकारांचे मत आहे. बाजरी, मका, तूर, मूग, उडदाचेही मोठे नुकसान झालेय. वर्षानुवर्षे जोपासलेल्या बागांतील अनेक ठिकाणी झाडे वाया गेली. नगर जिल्ह्यात सुमारे अकरा हजार हेक्टरवरील फळबागा वाया गेल्याचे स्पष्ट झालेय.
पीकनिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)
बाजरी ः २१ हजार, ज्वारी ः ३,७७४, मका ः ३० हजार, तूर ः ३१,४२६, भात १२००, मूग ः ८२९, उडीद ः २२८१४, मटकी ः ४, वाल ः ७८, हरभरा ः २३, हुलगा ः १७, सोयाबीन ः १,३४,६२९, भुईमूग ः ६२४, सूर्यफूल ः ५७, कांदा ः ३५,३४४, कापूस ः १,४४,७३०, चारापिके ः २५००, फळबाग ः ११,२६७.
श्रीगोंद्यात फळबागांचे नुकसान
नगर जिल्ह्यात दोन महिन्यांत झालेल्या नुकसानीत सोयाबीन, कापसाचे नुकसानच अधिक असले तरी श्रीगोंदा तालुक्यात फळबागांना अधिक फटका बसला आहे. जिल्ह्यात फळबागांचे सव्वा अकरा हजार हेक्टरवर नुकसान झाले असले तरी एकट्या श्रीगोंदा तालुक्यात सात हजार हेक्टरवर नुकसान झालेय. श्रीगोंद्यात केवळ फळबागांच्या मदतीसाठी २५ कोटींची गरज आहे. फळबागांना प्रतिहेक्टरी ३६ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेय. कापूस सोयाबीनवर आधारित अनेक शेतकऱ्यांचे शेती आहे. मात्र यंदा बहुतांश शेतकऱ्यांचे पीक वाया गेल्याने आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सरकारी पातळीवरून शेतकऱ्यांना तातडीने झालेल्या नुकसानीची मदत द्यावी.
- संभाजीराव दहातोंडे, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी मराठा महासंघ
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.