
Pune News : सुरू झालेला भीमा पाटस साखर कारखाना... उसाचे वाढलेले भाव... गुळाचे स्थिर बाजारभाव... गावी गेलेले कामगार आणि उसाचे कमी झालेले प्रमाण यामुळे दौंड तालुक्यातील अनेक गुऱ्हाळे बंद पडली आहेत.
गुऱ्हाळांची वाढलेली प्रचंड संख्या अनेक अंगांनी तालुक्याची डोकेदुखी ठरली होती. वाढते प्रदूषण, निकृष्ट प्रतीचा गूळ, गुळात होणारी भेसळ, स्वच्छतेचा अभाव, शालबाह्य मुले अशा अवगुणांची मालिकाच या गुऱ्हाळांमुळे उभी राहिली होती. त्यामुळे अनेक चांगल्या गूळ उत्पादकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता.
अलीकडील काळात काही तरुणांनी या व्यवसायाला आधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, त्यात लक्षणीय यश मिळाले नाही. आता तालुक्यातील मोठा आणि सर्वात जुना कारखाना दोन तीन वर्षांनंतर सुरू झाला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा पर्याय उपलब्ध झाला. या सर्वांचा परिणाम गुऱ्हाळ व्यवसायावर झाल्याचे बोलले जाते.
दौंड तालुक्यात भीमा पाटस सहकारी कारखान्यासह अनुराज शुगर (यवत) श्रीनाथ म्हस्कोबा (पाटेठाण), दौंड शुगर (आलेगाव) असे चार साखर कारखाने आहेत. त्यात भीमापाटस अनेक वर्षे बंद होता. हवेली तालुक्यातील थेऊर येथील साखर कारखाना तर अनेक वर्षांपासून बंदच आहे.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होत असल्याने चार कारखाने असूनही पाचशेहून अधिक गुऱ्हाळे जोमात चालत होती. सर्व गुऱ्हाळे मिळून एका कारखान्याचा ऊस गाळप करत होती.
यांपैकी ८० टक्के गुऱ्हाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा गूळ बनत होता. या गुऱ्हाळांमध्ये प्रदूषणकारी कचरा जाळला जात होता. अलीकडील काळात जागृत झालेले लोक प्रदूषणकारी कचरा जाळण्यासाठी विरोध करू लागले आहेत.
त्यातच भीमापाटस सुरू झाल्याने उसाला मागणी वाढली तसा त्याचा भावही वाढला. मात्र गुळाचा बाजार भाव कायम राहिला. याचाही परिणाम गुऱ्हाळ व्यावसायावर झाला आहे. त्यामुळे गुऱ्हाळांची संख्या कमी होऊ लागल्याचे बोलले जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.