
अलिबाग : मांडवा बंदरात (Mandva Port) साचलेल्या गाळामुळे प्रवासी जलवाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना वेळापत्रक सांभाळणे कठीण जात आहे.
ओहोटीच्या वेळी पाणी (Water) कमी असल्याने बंदरात होड्या येऊ शकत नाहीत, त्यामुळे भरतीची वाट पाहत वाहतूकदारांना बसावे लागते. याचा फटका रो-रो सेवेलाही बसत आहे.
बंदराच्या नैसर्गिक स्थानामुळे दरवर्षी मांडवा जेटीलगत मोठ्या प्रमाणात गाळ साचतो. येथून भाऊचा धक्का आणि गेट वे ऑफ इंडिया दरम्यान प्रवासी वाहतूक सेवा सुरू असते.
साधारण पावसाळ्यानंतर मांडवा बंदरातील गाळ काढण्यास सुरुवात होते. या वर्षी हे काम उशिराने सुरू झाले असून त्याचा फटका वाहतूकदारांना बसू लागला आहे.
ओहोटीमुळे २० टक्के फेऱ्या कमी झाल्या आहेत. थर्टी फर्स्टनिमित्त आलेल्या पर्यटकांनाही याचा त्रास झाला होता. यामुळे गाळ काढण्याची मागणी जोर धरू लागली. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने हे काम नुकतेच हाती घेतले आहे. ३.५ मीटर खोली वाढेल, या अनुषंघाने गाळ काढला जात आहे.
गाळ काढल्यानंतर मांडवा बंदरातील जलवाहतूक अधिक वेगाने सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मांडवा बंदरात दरवर्षी साचणारा गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.
सहा वर्षांत साधारण दोनशे कोटी रुपये गाळ काढण्यासाठी मेरीटाईम बोर्डाने खर्च केले आहेत. तरीही दरवर्षी साचणाऱ्या गाळामुळे बंदराचे बांधकाम आणि ब्रेक वॉटर सिस्टीमबद्दल वाहतुकदार तसेच मच्छीमारांकडून प्रश्न उपस्थित होत आहे.
बारमाही जलवाहतुकीसाठी मान्सूनमधील समुद्राच्या लाटा थोपवण्यासाठी मांडवा बंदरात १३५ कोटी रुपये खर्च करून बांधलेला ब्रेक वॉटर बंधारा बांधण्यात आला आहे.
मात्र तो चुकीच्या ठिकाणी बांधल्याने पावसाळ्यात समुद्राच्या लाटांबरोबर येणारा गाळ बंधाऱ्यामुळे अडकतो. त्यामुळे जलवाहतुकीला फटका बसत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.