
सोलापूर ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘चला जाणूया नदीला’ (Nadi Samvaad Yatra) अभियानाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात नदी संवाद यात्रा सुरू आहे. या अभियानाच्या तिसऱ्या दिवशी प्रभातफेरी, जलपूजन, विद्यार्थ्यांना नदी संवर्धनाची शपथ यासह विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी तन्मनतेने घेतलेला सहभाग, आजीबाईंनी सादर केलेले भारूड, शिक्षकांनी सादर केलेले उपक्रम यामुळे रंगत आली.
जिल्ह्यातील कासाळगंगा, भीमा, कोरडा, आदिला, दुबदुबी आणि माणगंगा नद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आलेगाव येथे नदी संवाद यात्रेअंतर्गत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली व नदी ठिकाणी जाऊन कलशाची पूजा करून नदीची ओटी भरण्यात आली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलिस पाटील, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गट महिला, गावातील विविध कर्मचारी, गावातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
सांगोला पंचायत समितीमार्फत सहायक गट विकास अधिकारी काळुखे, कृषी मंडल अधिकारी भंडारे, नदी संवाद यात्रा तालुका समन्वयक वैजनाथ घोंगडे, कोरडा नदी समन्वयक राजू वाघमारे, तालुका कृषी सहायक बर्गे, ग्रामसेवक साळुंखे व तलाठी कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अक्कलकोट तालुक्यातील ग्रामपंचायत आळगे, गारडी, पळशी, तरटगाव (ता. पंढरपूर), केतूर (ता. करमाळा), वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वाडीकुरोली, जि. प. शाळा, बादलकोट, जि. प. शाळा सांगवी, श्री सिद्धेश्वर विद्या मंदिर, माचणूर (ता. मंगळवेढा), लोणारवाडी (ता. पंढरपूर), लवंगी (ता. दक्षिण सोलापूर) आदी ठिकाणी कलश पूजन आणि कलश दिंडी, रांगोळी, चित्रकला स्पर्धा, नदी संवर्धनाची शपथ यासह मान्यवरांचे मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
जि. प. शाळा सिद्धापूर (ता. मंगळवेढा) येथील श्री. बिदरकर आणि श्री. एडगे या शिक्षक जोडीने बहारदार कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांना नदीसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. मान्यवरांचा पर्यावरण अभ्यास पुण्याच्या ‘यशदा’चे माजी संचालक डॉ. सुमंत पांडे आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉ. अजित गोखले यांनी पर्यावरण अभ्यासात सहभाग घेतला. कटफळ (ता. सांगोला) येथील उगमस्थान ते चंद्रभागा नदीचा संगम शेळवे (ता. पंढरपूर) या दरम्यान हा पर्यावरण अभ्यास करण्यात आला. घरकुलाचे नाव ठेवले धुबधुबी निवास धुबधुबी नदी संवाद यात्रेचे स्वागत दक्षिण सोलापूर तालुक्यात दिंडूर या गावी करण्यात आले.
संवाद यात्रेच्या स्वागतप्रसंगी नागनाथ इरप्पा चिक्कळी या ग्रामस्थाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलाचे नाव धुबधुबी निवास ठेवल्याचे जाहीर केले. ग्रामसेविका सुरेखा सरोळे यांच्या कल्पनेतून हे नाव दिल्याचे व नदी संवाद यात्रेच्या जनजागृतीतून हे नाव सूचल्याचे चिक्कळी यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.