
अॅग्रोवन वृत्तसेवा
अकोला : पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या बळावर कितीही अतिरेक केला, तरी यापुढेही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लढा कायम ठेवू. कार्यकर्त्यांची लवकरच बैठक घेत पुढील आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला.
बुलडाणा येथील आंदोलनानंतर न्यायालयीन कोठडीत त्यांच्यासह २५ कार्यकर्त्यांची रवानगी झाली होती. गुरुवारी (ता. १६) सकाळी अकोला कारागृहातून बाहेर आल्यानंतर तुपकर यांनी पुढील भूमिका स्पष्ट केली.
शनिवारी (ता. ११) बुलडाणा येथे सोयाबीन-कापूस दरवाढ, पीकविमा, अतिवृष्टीची मदत अशा विविध विषयांवर तुपकरांच्या नेतृत्वात आत्मदहन आंदोलन झाले होते.
या वेळी पोलिसांनी श्री. तुपकर यांना व त्यांच्या २५ साथीदारांना ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केले होते. आंदोलनस्थळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमारही केला होता.
यानंतर पोलिसांनी विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. न्यायालयाने तुपकर व त्यांच्या साथीदारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.
दरम्यान, सर्वांना जामीन मिळाल्याने गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता कारागृहातून सोडण्यात आले. या वेळी बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यांतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी पत्रकारांशी बोलताना श्री. तुपकर पुढे म्हणाले, की पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या बळावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे.
मात्र अशा प्रकारचे कितीही आंदोलन दडपले तरी हा लढा थांबणारा नाही. जोपर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहोत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.