
कोल्हापूर ः बाजार समितीत गुरुवारी (ता. ५) गूळ सौदे बंदचा (Jaggery Market) प्रश्न कायमच राहिला. माथाडी कामगारांच्या मागण्यांवर (Labor Demand) सलग तिसऱ्या दिवशीही तोडगा निघाला नाही. उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षात दुपारी बैठक झाली.
त्यातही माथाडी कामगार आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने तिसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा निघू शकला नाही. परिणामी व्यापारी व शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत शुक्रवार (ता. ६)पासून बाहेरचे माथाडी आणून काम सुरू करण्याचा इशारा दिला.
माथाडी कामगारांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे तिसऱ्या दिवशीही यार्डातील गूळ सौदे स्थळी शुकशुकाट होता. चार दिवसांपूर्वी उपस्थित झालेला मजुरी वाढीच्या मागणीसाठी बुधवारी (ता. ४)दुपारी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या कक्षात बैठक झाली होती. त्यात ५० टक्के माथाडी मजुरी वाढ देण्याच्या मागणीवर माथाडी कामगार ठाम राहिले तर व्यापाऱ्यांनी मजुरी वाढ देण्यास नकार देताच बैठक फिसकटली.
त्याचवेळी उपजिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेण्याचे ठरले होते. त्यानुसार गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातही बैठक झाली. या बैठकीला शेतकरी व्यापारी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आलेला गूळ माथाडी उतरून घेतात. त्या माथाडींना व्यापारी व अडते मजुरी देतात. बाजारपेठेत आलेला गूळ उतरवणे, वजन करणे, थप्पीला लावणे अशी कष्टाची कामे आम्ही करतो. त्यातुलनेत आम्हाला मजुरी कमी मिळते यापुढील कामासाठी आम्हाला ५० टक्के मजुरी वाढ द्यावी, असा मुद्दा माथाडींनी मांडला.
यावर व्यापाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेतला आम्ही गुळाचा व्यवसाय नगण्य नफ्यात करतो आमचा गूळ वेळेत गुजरातला पोहचला नाही तर आमचेही नुकसान होते. गूळ बाजारपेठेत स्पर्धा वाढली आहे, गुजरातमधून गुळाची मागणी कमी होत आहे.
वाहतुकीचे भाडे, गोदाम भाडे वाढते, शेतकऱ्यांना दरही चांगला देतो तरीही आम्ही माथाडी कामगारांना राज्यभरातील बाजारपेठेतील मजुरीपेक्षा जास्त मजुरी आम्ही कोल्हापुरात देतो.
यापूर्वीच आम्ही मजुरी वाढ दिली आहे, यापेक्षा जास्त मजुरी देणे आम्हाला परवडत नाही. असे ठामपणे सांगितले. तसेच तुम्ही अचानकपणे सौदे बंद केल्याने आमचेही नुकसान झाले त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रति प्रश्नही केला.
‘सौदे सुरू ठेऊन मजुरीवर चर्चा करा’
सौदे बंद बाबत शेतकऱ्यांनी ही नाराजी व्यक्त केली. दर आठ पंधरा दिवसाला सौदे बंद करता, तुम्ही सौदे बंद केले तरी आम्हाला गुळाचे उत्पादन घ्यावे लागते उत्पादित गुळाचे सौदे झाले नाहीतर आमचा गूळ पडून राहतो यात आमचे नुकसान होते. त्यामुळे सौदे सुरू ठेवून मजुरीवर चर्चा करा, अगोदर सौदे सुरू करा, असे आवाहन केले.
पोलिस बंदोबस्तावर विचार विनिमय
उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनीही तोडगा निघे पर्यंत सौदे सुरू ठेवा असे आवाहन केले मात्र माथाडी कामगारांनी कोणाचेही म्हणणे जुमानले नाही. तेव्हा बाजार समितीने उद्यापासून पोलिस बंदोबस्त द्यावा. बाहेरचे माथाडी आणून काम सुरू करण्याबाबत व्यापारी अडते शेतकऱ्यांनी विचार विनियम सुरू केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.