
Nashik News नाशिक : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा (Hailstorm) मोठा फटका असतानाच निफाड तालुक्यात शनिवारी (ता. १८) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने उत्तर व पश्चिम भागातील द्राक्ष बागांना (Vineyard Damage) मोठा तडाखा दिला आहे.
वीस मिनिटे झालेल्या जोरदार गारांच्या फटक्यात द्राक्ष बागांसह उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Onion Crop Damage) झाले आहे. तर देवळा तालुक्यातील दाहिवड परिसरात कांदा गहू पिकाचे नुकसान आहे. ऐन द्राक्ष काढणीच्या हंगामात झालेल्या नैसर्गिक कोपामुळे शेतकरी पूर्णता उद्ध्वस्त झाला आहे.
निफाड तालुक्यातील कुंभारी व पंचकेश्वर शिवारात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या अस्मानी संकटाच्या फेऱ्यांमध्ये काढणीस आलेल्या द्राक्षबागा बाधीत झाल्याने कोट्यावधी रुपयांचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे.
विजांच्या कडकडाटासह गारपीट होऊन द्राक्षबागा व कांदा पिकांमध्ये अक्षरशः गारांचा खच साचला होता. यासह सोंगणीच्या अवस्थेत असलेला गहू आडवा झाला आहे.प्रामुख्याने कुंभारी, पंचकेश्वर, वनसगाव, खानगाव, खडकमाळेगाव, रानवडसह काही भागात हे नुकसान झाले आहे.
एकीकडे शेतमालाला अपेक्षित तर मिळत नसल्याने मोठ्या अडचणीत शेतकरी सापडलेला असताना नैसर्गिक आपत्तीमुळे तो पूर्णपणे हतबल झाला आहे. यापूर्वी पावसामुळे द्राक्षमण्यांना तडे गेल्याने मोठे नुकसान होते.
सायंकाळी कुंभारी, पंचकेश्वर येथे झालेली गारपीट झाली तर साडेसहा वाजेनंतर गोदाकाठ परिसरातील म्हाळसाकोरे परिसरात पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील कुंभारी, पंचकेश्वर, वनसगाव, उगाव, देवपूर, ब्राह्मणगाव, रानवड या गावांना शनिवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारांनी झोडपले.
वादळी वारा व गारपिटीचा पिढीचा अंदाज दिल्यानंतर अनेक भागात शेतकऱ्यांनी द्राक्ष काढण्याची लगबग सुरू केली होती. त्याचा परिणाम दरावर मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसताना हे संकट शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे ठरले.
त्यातच घडांना गारांचा मार लागल्याने मालाची नासाडी झाली आहे. याशिवाय रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा वाढीच्या अवस्थेत असताना कारपेटीच्या फटक्यात कांद्याची पात तुटून पडली आहे.
बीजोत्पादन क्षेत्राला फटका
देवळा तालुक्यात दुपारी तीन वाजेच्या सुमारास दहिवड येथील भौरी मळा परिसरात सुमारे पंधरा ते वीस मिनिटे गारा पडल्या.
त्यामुळे कांदा, गहू, डाळिंब, कांदा बीजोत्पादन क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पश्चिम भागातील खर्डे, शेरी, कनकापूर, वार्शी व हनुमंतपाडा परिसरात देखील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने झाल्याने कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.
शासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी
गेल्या सप्ताहापासून वादळी वाऱ्यांचे संकट डोक्यावर असताना गारपिटीने आता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.