
Hapus Mango Production रत्नागिरी ः बदलत्या वातावरणामुळे (Climate Change) यंदा पहिल्या टप्प्यातील हापूसचे उत्पादन (Hapus Production) अवघे दहा टक्केच होणार आहे. एकूण उत्पादनक्षम बागांपैकी सुमारे ५ हजार हेक्टरमधूनच आंबा उत्पादन (Mango) मिळेल.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सलग थंडी राहिल्यामुळे पुढील टप्प्यात आलेल्या मोहोरातून मिळणारे उत्पादन एप्रिलच्या अखेरीस राहील.
मे महिन्यात मुबलक आंबा आला तरीही दर कमीच मिळेल. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट राहील, असा अंदाज आहे.
जानेवारीत झाडांवरील फ्लॉवरिंगमधून फळधारणाच झाली नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात उत्पादनक्षम क्षेत्रापैकी दहा टक्केच झाडांतून उत्पादन मिळेल.
जिल्ह्यात सुमारे ६८ हजार हेक्टरवर हापूसची लागवड आहे. त्यातील उत्पादनक्षम क्षेत्र हे दरवर्षी ६० टक्के म्हणजेच ४० हजार ८०० हेक्टरमधूनच उत्पादन मिळते. या वर्षी पावसाचा कालावधी लांबला, अपेक्षित थंडीही पडली नाही.
डिसेंबर महिन्यात थंडी होती. जानेवारी महिन्यात मोहोर आला, पण त्यामधून फळधारणा झाली नाही. त्याचा फटका पहिल्या टप्प्यातील उत्पादनाला बसला आहे.
पुढील टप्प्यात जानेवारीत सलग पंधरा दिवस पारा खाली राहिल्याने हवेत गारवा होता. पालवी जून झालेल्या झाडांना मोहोर येण्यास सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यापर्यंत मोहर येत राहतो. त्यामधून मे महिन्याच्या मध्यात आंबा मिळेल.
हे बदल होतानाच मोहर येऊन गेलेल्या काही झाडांना पुन्हा मोहर येत आहे. ही चिंताजनक बाब असून, त्याचा परिणाम झाडावर होणार आहे. तो मोहर टिकणार नाही.
या मोहरावर नियंत्रण ठेवतानाच त्यातून फळधारणा कशी होईल, यासाठी बागायतदारांना फवारण्यांचे नियोजन करावे लागत आहे. यावर मे महिन्यातील उत्पादन अवलंबून आहे.
आताच्या परिस्थितीनुसार, सर्वाधिक आंबा एप्रिलच्या अखेरीस किंवा मे महिन्यात येईल. गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यानंतर मुबलक हापूस बाजारात आला आणि दर घटले. यंदा त्याही पुढे हंगाम जाणार आहे.
सध्या राजापूर तालुक्यातील किनारी भाग, रत्नागिरी तालुक्यातील पावस, हरचेरी परिसरांतील काही बागांना फळधारणा झाली आहे. तर गुहागर, मालगुंड या परिसरांत सर्वप्रथम फळधारणा होणाऱ्या परिसरात अजूनही परिस्थिती चिंताजनक आहे.
एकाचवेळी सर्व आंबे येण्याची भीती
मे महिन्यात हापूसच्या बरोबरीने अन्य राज्यांतील आंबे दाखल होतील. कर्नाटकी आंबा यंदा उशिरा आहे. देवगड हापूसही बाजारात उशिरापर्यंत राहील.
गुजरातच्या आंब्याचे आव्हान राहू शकते. एकाचवेळी सर्वप्रकारचे आंबे दाखल झाल्याने त्याचा हापूसच्या दरावर परिणाम होईल. तसेच कर्नाटकी आंबा हापूसच्या नावाने विक्री होण्याचा धोका राहू शकतो, अशी भीती आहे.
मार्च महिन्यात हापूसची आवक दरवर्षी सरासरी १५ हजार पेट्यांच्या दरम्यान असते. यंदा त्याहून कमी राहील. तर मुबलक हापूस मे महिन्यातच राहील. वातावरणातील बदलांमुळे ही परिस्थिती उद्भवेल. एकाचवेळी हापूस बाजारात दाखल झाल्याने त्याचा परिणाम दरावर होईल.
- आनंद देसाई, आंबा बागायतदार
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.