
बाळासाहेब पाटील ः ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : उस्मानाबाद येथे रोजगार हमी योजनेत (Rohayo) झालेल्या एक कोटी १२ लाख रुपयांच्या गैरव्यवहाराची फेरचौकशी करण्यात येईल, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी शुक्रवारी (ता. ३०) विधानसभेत दिली.
शिवसेनेचे उस्मानाबादचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर भुमरे यांनी माहिती दिली.
आमदार पाटील यांनी, उस्मानाबाद जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी दोषी अधिकाऱ्यालाच चौकशी अधिकारी बनविल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच बोगस जॉब कार्ड तयार करून ७२ मजुरांचे मस्टर तयार केले आहे.
परजिल्ह्यातील मजुराची नोंदणी केली आहे. त्यामुळे या योजनेत मोठा अपहार झाला आहे.
आमदार प्रकाश सोळंके यांनीही सरकारच्या फसवणुकीचा मुद्दा उपस्थित करत एक कोटी १२ लाखांची फसवणूक केली जात असेल तर संबधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही, ‘‘फसवणुकीचे मोठे जाळे महाराष्ट्रात आहे. त्यामुळे या सगळ्यांचा शोध घेण्यात यावा.’’ अशी मागणी केली.
रोजगार हमी योजना मंत्री भुमरे यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी झाली असून यातील ७५ लाख रुपयांचे रक्कम वसूल केली आहे. तरीही काही त्रुटी असतील तर या प्रकरणाची फेरचौकशी करण्यात येईल. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती दिली.
या प्रकरणात गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर सहायक गटविकास अधिकाऱ्याची चौकशी करण्यात आली आहे. याप्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर दोषी कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली आहे. तसेच नियमित दोषी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.