
Orange Cultivation नागपूर ः गेल्या पाच वर्षापासून रखडलेल्या पतंजली समूहाच्या (Patanjali) संत्रा प्रक्रिया प्रकल्पाला (Orange Processing Project) अखेर मुहूर्त मिळाला आहे.
यावर्षी ऑक्टोबर मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होणार असून. याठिकाणी सुमारे ४०० टन संत्र्यावर दर दिवशी प्रक्रिया केली जाणार आहे. परिणामी विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्र्याच्या अर्थकारणाला (Orange Economy) गती येणार आहे.
नागपुरी संत्र्याने रंग आणि चवीच्या बाबतीत वेगळेपण जपले आहे. मात्र टीकवण क्षमता कमी असल्याने निर्यातीला मर्यादा आहेत. दुसरीकडे प्रक्रिया उद्योगाचा अभाव असल्याने मर्यादित विक्री पर्यायामुळे संत्रा फळांचे दर दबावात राहत होते.
या पार्श्वभूमीवर संत्र्यावर प्रक्रिया करणारा मोठा उद्योग या भागात झाल्यास संत्रा उत्पादकांचे व्यापक हित जपले जाणार होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही बाब लक्षात घेत पतंजली समूहाचे बाबा रामदेव यांना त्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली.
बाबा रामदेव यांनी देखील त्यास संमती दर्शविली. त्यानंतर मिहान मधील विशेष आर्थिक क्षेत्रात या प्रकल्पासाठी २३४ एकर जमीन निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून पतंजली समूहाला देण्यात आली.
संत्रा उत्पादकांचे व्यापक हित जपणारा हा प्रकल्प असल्याने कमी दरात जमीन देण्यात आली. ऑगस्ट २०१७ मध्ये जमिनीचे हस्तांतरण झाल्यापासून मात्र हा प्रकल्प पुढे सरकला नाही.
त्यामुळे केवळ कमी दरात जमिनीचा ताबा घेण्यासाठीच बाबा रामदेव यांनी हा सारा खटाटोप केल्याचा आरोप गेल्या पाच वर्षांत झाला.
पतंजली समूहाने मात्र हे सारे आरोप खोटे ठरवीत ऑक्टोबरच्या मुहूर्तावर प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
या भागातील संत्रा उत्पादकांसाठी नव्या वाणाचा पर्याय देण्याचा प्रयत्नही केला जाईल. त्याकरिता ट्रायल घेतल्या जातील. सात वर्षांत नवे संत्रा वाण दिले जाईल, अशी माहिती पतंजली समूहाच्या सूत्रांनी दिली.
प्रकल्प स्थिती पाहण्यासाठी महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधरराव ठाकरे, मनोज जवंजाळ, प्रशांत कुकडे यांनी ‘मिहान’चे विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील यांच्यासोबत पाहणी केली.
दर दिवशी ४०० टन फळांवर प्रक्रिया
दर दिवशी ७०० टन संत्रा-मोसंबी फळावर प्रक्रिया करणारे सयंत्र या ठिकाणी उभारले जाईल. मात्र पहिल्या टप्प्यात ४०० टन संत्रा-मोसंबी फळावर प्रक्रिया होईल. हा मल्टीलाईन प्रकल्प असून त्यामध्ये इतरही फळांवर प्रक्रिया केली जाईल.
संत्रा कॉन्सन्ट्रेट या ठिकाणी पहिल्या टप्प्यात तयार केले जाईल. त्यानंतर पतंजली ब्रांडने संत्रा ज्यूस विक्रीचे नियोजन आहे.
त्याकरिता रेसिड्यू फ्री संत्रा फळे खरेदी केली जातील. अशा प्रकारच्या फळ उत्पादनासाठी आजवर सुमारे ५००० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. पतंजली समुहाच्या तज्ञांच्या मार्गदर्शनात बागांचे व्यवस्थापन होईल.
प्रकल्पाविषयी अनेक गैरसमज होते. ते दूर करण्यासाठी प्रकल्पस्थळाची पाहणी केली. ऑक्टोबरपासून संत्रा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केला जाईल. पहिल्या टप्प्यात दर दिवशी ४०० टन फळांवर प्रक्रिया होईल.
- श्रीधरराव ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.