तेलंगणात अतिघन कापूस लागवडीचा पथदर्शी प्रकल्प

या मागे कमीतकमी रासायनिक घटक ( Chemicals) आणि निविष्ठांचा वापर व्हावा असा उद्देश आहे. कापूस उत्पादकपट्ट्यात सध्या मजुरांच्या उपलब्धतेची मोठी अडचण आहे. त्यांची ही अडचण दूर करण्यात हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी ठरणार असल्याचा विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे.
Cotton Cultivation
Cotton CultivationAgrowon

नागपूर ः एकरी झाडांची संख्या वाढवीत त्या माध्यमातून कापूस उत्पादकता (Cotton Productivity) वाढीच्या प्रकल्पाची अंमलबजावणी यंदाच्या हंगामात तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यात केली जाणार आहे. अतिसघन लागवडीचा हा प्रयोग सुमारे ५०० एकरावर केला जाणार असून त्यातील १५० एकरावरील लागवड झाली आहे.

सामान्य लागवड पद्धतीत एकरी झाडांची संख्या ८ हजारच्या घरात राहते. अतिसघन लागवड पद्धतीत एकरी झाडांची संख्या २५ हजारांपेक्षा अधिक राहते. पिकवाढरोधकांचा वापर करून त्याआधारे पिकांची वाढ नियंत्रित ठेवली जाणार आहे. त्यासोबतच या प्रकल्पात एकदाच वेचणी होईल, अशाप्रकारच्या कापूस वाणांची निवड करण्यात आली आहे.

त्यासोबतच पुढील टप्प्यात कच्च्या कापसावर प्रक्रिया करण्याचेदेखील नियोजन असल्याची माहिती या प्रकल्पात समावेशीत एका अधिकाऱ्याने दिली. काळ्या भारी जमिनीऐवजी कापसाला पोषक अशा जमिनींची निवड या प्रकल्पाकरिता केली गेली आहे.

या मागे कमीतकमी रासायनिक घटक ( Chemicals) आणि निविष्ठांचा वापर व्हावा असा उद्देश आहे. कापूस उत्पादकपट्ट्यात सध्या मजुरांच्या उपलब्धतेची मोठी अडचण आहे. त्यांची ही अडचण दूर करण्यात हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी ठरणार असल्याचा विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे. एका शास्त्रज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प उत्पादकता वाढीत जादूच्या कांडीसारखी भूमिका बजावणार नाही.

त्याकरिता आवश्‍यक त्या वेळी पीकवाढरोधकांचा वापर करण्याची गरज राहील. त्याचा वेळीच वापर व्हावा याकरिता कृषी विभागाच्या पथकाने सजग राहणे व व्यवस्थापनाविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढविण्याची आवश्‍यकता राहणार आहे.

अतिसघन लागवड पद्धतीत बियाणे दर वाढणार आहे. त्यामुळे आपसूकच उत्पादकता खर्चात वाढ होईल. देशाच्या एकंदरीत बीजोत्पादनाचा विचार करता संकरित पद्धतीचे इतके कापूस बियाणे उत्पादन शक्‍यच नसल्याचे तज्ज्ञ खासगीत सांगतात. मजुरांची उपलब्धता हादेखील बीजोत्पादनातील अडसर आहे. परंतु त्यानंतरही देशात कधी बीटी कापूस बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला नाही. त्यावरूनच या क्षेत्रातील कंपन्यांची बनवाबनवी लक्षात येते. प्रगत आणि तंत्रज्ञानात पुढारलेल्या अमेरिकेत सरळ वाणांचा वापर होतो. परंतु कृषी प्रधान म्हणविणाऱ्या भारतात मात्र शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांचे हित जपले जात संकरित बियाण्यांना मान्यता दिली जाते. पूर्वी एकरी पाच किलो सरकी पेरली जात होती. आता शेतकऱ्यांना कंपन्यांचे गुलाम करण्यात आले आहे यातून शेतकरी आत्मनिर्भर कसा होईल? त्यामुळे अतिसघन पद्धतीत सरळ वाणांचा उपयोग झाला तरच ते फायदेशीर ठरणार आहे अन्यथा नाही.

विजय जावंधिया, शेतीप्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक

केंद्रीय कापूस सरदार संस्थेने आठ-दहा वर्षांपूर्वीची यावर काम केले आहे. यातून दुप्पट तिप्पट उत्पन्न शक्य आहे. शाखीय वाढ तसेच सरळ वाढणाऱ्या वाणाची अतिसघन लागवडीत गरज राहते. आयसीएआरच्या कोइमतूर येथील केंद्राने अशा प्रकारचे वाण विकसित केले आहे. या वाणाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

त्रिलोचन मोहपात्रा, महासंचालक, भारतीय कृषी संशोधन परिषद, दिल्ली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com