
अकोला ः आपल्याकडे पुर्वीपासून आंबा पिकाला (Mango Orchard) कधी व्यावसायिक पीक (Commercial Crop) समजले गेले नाही. पण हा दृष्टिकोन गेल्या काही वर्षांत बदलला आहे. आता जाणीवपूर्वक बागा लावल्या जात आहेत. अनेक शेतकरी चांगले उत्पन्न (mango Production) मिळवत आहेत; मात्र, आंबा लागवड (Mango Cultivation) करताना सूक्ष्म नियोजन, व्यवस्थापन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ व आंबा तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी केले.
कृषी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व हॉर्टीफ्रेश शेतकरी कंपनीच्या पुढाकाराने मंगळवारी (ता. २९) विदर्भातील अतिघन आंबा लागवड मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी डॉ. कापसे बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी, हॉर्टीफ्रेश शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अनिल बोंडे व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. गडाख म्हणाले, की फळबाग लागवडीत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. यासाठी शासकीय योजनेचे पाठबळ, शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरला. आज राज्यात १८ ते १९ प्रकारची फळपिके घेतली जातात. यात २५ टक्के क्षेत्र एकट्या आंबा पिकाचे आहे. देश आज अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला.
पण शेतकरी गरीब आहे. यामागे उत्पादकता कमी, उत्पादन खर्च अधिक, बाजार मूल्य न मिळणे अशी कारणे आहेत. हे चित्र बदलण्यासाठी उत्पादित मालावर प्रक्रिया होणे आवश्यक आहे. आंबा पिकाच्या अनुषंगाने विद्यापीठ स्तरावर संशोधनाचे काम चांगले होत आहे. उत्पादकांना तंत्रज्ञानाच्या अंगाने जी मदत लागेल त्यासाठी विद्यापीठ सदैव तयार असेल, असे त्यांनी आश्वस्त केले.
डॉ. कापसे म्हणाले, की पूर्वी आपल्याकडे ‘आंब्याचे झाड आबा लावतो आणि नातू फळे चाखतो’ असे म्हटले जायचे. याचाच अर्थ झाड लावले की ते त्याच्या पद्धतीने विकसित व्हायचे. अनेक वर्षांनी त्यापासून फळे मिळायची. पण आता काळ बदलला. आंबा बागेतून तिसऱ्या वर्षापासून उत्पादन सुरू होते.
त्यामुळे आता आपलाही हा दृष्टिकोन बदलला पाहिजे. लागवड करण्यासाठी पुढे येत असताना या बागेला पाण्याची गरज नाही, हा समज दूर करावा. आंबा उत्पादनात पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. इतर झाडे कमी पाणी झाले तर लक्षणे दाखवतात. आंबा बागेला पाणी मिळाले नाही तर त्याची लक्षणे लगेच दिसणार नाहीत. परंतु पाण्याचा बागेला तडाखा बसतो. त्याचा परिणाम बागेवर, उत्पादनावर होतो. यामुळे योग्यवेळी पाणी हवेच असते. संरक्षित सिंचनाची खात्री असेल तरच बाग लावा, असेही ते म्हणाले.
या कार्यशाळेत डॉ. कापसे यांनी विविध विषयांवर शास्त्रशुद्ध माहिती दिली. डॉ. पंचभाई यांनी विद्यापीठस्तरावर होत असलेल्या संशोधन कार्याची माहिती देत कार्यशाळेला उपस्थितांचे आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.