
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोंबरी परिसरात मुबलक पाण्यामुळे यंदा रब्बी हंगामाला (Rabbi Season) मोठा आधार झाला आहे. येथील गिरिजा-पूर्णा नदीपात्रावरील बंधाऱ्यात बऱ्यापैकी जलसाठा आहे, त्यातच विहिरींची पाणीपातळीही समाधानकारक असल्याने रब्बी हंगामातील पिकेही जोमात आहेत.
भोकरदन तालुक्यातील केदारखेडा, जवखेडा ठोंबरी परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली होती. त्यातच परतीच्या पावसाचा फटकाही खरिपातील पिकांना बसलेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर आहे. परतीच्या पावसामुळे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत परिसरातील नदीनाले वाहते राहिले. त्यात यंदा जवखेडा ठोंबरी येथील गिरिजा-पूर्णा नदीपात्रावरील बंधाऱ्याला दरवाजे बसविण्यात आले. त्यामुळे प्रथमच नदीपात्रातील जलसाठा वाढण्यास मोठी मदत झाली. या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात जवळपास चार किलोमीटर अंतरापर्यंत पाणी साठा झालेला आहे. त्यामुळे केदारखेडा, जवखेडा ठोंबरी, बामखेडा परिसरातील शेतकऱ्यांनाही मोठा आधार झाला. परिसरात रब्बी हंगामात अनेक शेतकऱ्यांनी मका पिकाला पसंती दिलेली आहे. सध्या शेतशिवारातील मक्याचे पीक बहरलेले आहे. काही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाच्या साहाय्याने मका पीक घेतले आहे. याशिवाय अनेक शेतकऱ्यांनी यंदा गव्हाचीही पेरणी केलेली आहे. काही जणांनी हरभऱ्याचे पीकही घेतले आहे. शेतशिवारातील पिके सध्या बहरलेली आहेत.
मध्यंतरीच्या बदलत्या वातावरणामुळे मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे शेतकऱ्यांना औषधी फवारणीबाबत हालचाली कराव्या लागत आहेत. दरम्यान, काही शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही कपाशी उभी आहे. फरदड कापसातून रब्बी हंगामातील पिकांच्या मशागतीसह खत, औषधीसाठी आर्थिक तजवीज होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. केदारखेडा मंडळात अतिवृष्टी, परतीचा जोरदार पाऊस यामुळे पाणीपातळीत मोठी वाढ झाली.
सध्या बंधारे, तलावांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा आहे. विहिरींची पाणीपातळीही वाढलेली आहे. त्यामुळे विहिरींतील पाणीसाठा फेब्रुवारी महिन्यापर्यंत पुरेल, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे.
परिसरातील नदीपात्रातील पाणी आधी वाहून जात होते. आता बंधारा उभारणीसह दरवाजे बसविल्याने सिंचनाची सोय झाली. नदीपात्रातील पाण्यामुळे भूजल पातळी वाढली. आता रब्बी हंगामासाठी मोठा लाभ होणार आहे.
- बबनराव काळे, बामखेडा, शेतकरी
जवखेडा ठोंबरीतील गिरिजा-पूर्णा नदीवरील बंधाऱ्यामुळे पाणी अडले. जवखेडा ठोंबरी, बामखेडा, केदारखेडा येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. शेतीच्या पाण्याची सोय झाली. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याबाबत दिलासा मिळाला आहे.
-रूस्तुमराव सहाने, शेतकरी, केदारखेडा
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.