
Marathi Sahitya Sammelan वर्धा : ‘‘साहित्याच्या व्यासपीठावर आम्ही राजकारणी काय करतो ? असे प्रश्न केले जातात. आम्ही राजकारणी नसल्यास व्यंगचित्रकारांना फार काम उरणार नाही. आमच्यातही साहित्यिक लपले आहेत. आमच्याकडे कवी आहेत, संहिता लिहिणारे आहेत, शीघ्रकवी आहेत.
आमच्याकडे यमक जुळविणारे कवी आहेत. आम्हाला थोडी जागा मिळाली की हा पवित्र मंच व्यापून कसा घ्यायचा, याचा प्रयत्न आम्ही करतो. सकाळी टीव्ही लावला की त्यांचे साहित्य ओसंडून वाहते. यातूनच साहित्यिकांना प्रेरणा मिळते,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महात्मा गांधी साहित्यनगरीत आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अखेरच्या दिवशी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
खासदार रामदास तडस, डॉ. अनिल बोंडे, आमदार पंकज भोयर, समीर कुणावार, समीर मेघे, माजी आमदार सागर मेघे, संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते, महामंडळाचे अध्यक्ष उषा तांबे, डॉ. उज्वला मेहेंदळे, विलास मानेकर, गजानन नारे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘संमेलनाध्यक्षांनी काही चिंता व्यक्त केल्या, त्या योग्य आहेत. मराठीच्या शुद्धीकरणाबाबत, व्याकरणाबाबत ते बोलले. मराठी ही ज्ञान भाषा असली तरी त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकलो नाहीत आणि नव्या पिढीचा ओढा मराठीकडे कमी झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नव्या शिक्षण नीतीमध्ये वैद्यकीय, तंत्र आणि सर्व प्रकारचे शिक्षण मराठीतून देऊ शकणार आहोत. ज्ञान व्यवहारात मराठीचा समावेश होईल आणि मराठीबाबतची चिंता दूर होईल.
‘विदर्भ साहित्य संघाला १० कोटी’
‘‘विदर्भ साहित्य संघाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. या संघाने मराठी साहित्य आणि साहित्यिकांचे संवर्धन करण्याचे कार्य स्वातंत्र्यपूर्व काळापासून केले आहे.
वैदर्भीय नागरिक म्हणून मला अभिमान वाटेल, असे कार्य या संस्थेने केले. त्यामुळे या संघाला शताब्दी वर्षानिमित्त १० कोटी रुपये देत आहोत,’’ अशी घोषणा फडणवीस यांनी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.