
कोल्हापूर: जिल्ह्यात रविवारी ४३० ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchayat Election) चुरशीने मतदान (Voting) झाले. दुपारी दोन वाजेपर्यंत ५० टक्के मतदान झाले होते. या निमित्ताने गावोगावी प्रचंड राजकीय ईर्षा दिसून आली. राजकीय चुरस असलेल्या गावांमध्ये मतदान केंद्राजवळ जत्रेचे स्वरूप दिसून आले. संवेदनशील गावामध्ये किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडले. अनेक ठिकाणी मशिन बंद पडण्याच्या घटना घडल्यामुळे मतदानास विलंब झाला.
शेतकरी, शेतमजूर व नोकरदारांनी रविवारी (ता.१८) सकाळी लवकर मतदानाचा अधिकार बजावला. यामुळे सकाळी दहा वाजेपर्यंत मतदानाचा वेग प्रचंड होता. बहुतांशी गावामध्ये सकाळच्या टप्प्यातच मतदान केंद्रात जत्रेचे स्वरूप आल्याचे चित्र होते. दुपारनंतर मात्र शिल्लक नावे काढून मतदार आणण्यासाठी उमेदवार प्रतिनिधींची धडपड सुरू होती. अनेक गावांमध्ये मतदार आणण्यासाठी वाहनांचा सर्रास वापर झाला. तालुका जिल्हा पातळीवरील लोकप्रतिनिधींनी काही गावांमध्ये दौरे करून मतदारांशी संपर्क साधला.
६० गावांमधील सरपंच व विविध गावांमधील ८४७ सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. दुसरीकडे सरपंच पदासाठी ४१४ जागांसाठी ११९३ उमेदवार, तर सदस्यपदाच्या ४ हजार ४०२ जागांसाठी ८९९५ उमेदवारांचे भवितव्य मशिन बंद झाले. जिल्ह्यात निवडणुकीसाठी २०१५ केंद्रे होती.
यासाठी १० हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच या कालावधीत मतदान झाले. मतमोजणी मंगळवारी (ता.२०)होणार आहे. शीघ्र कृती दल आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात ४ हजार पोलिस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.