
नाशिक : केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत (national Food Security Mission) अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना जानेवारी २०२३ पासून पुढील एका वर्षासाठी मोफत अन्नधान्य (Free Grain) देण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे गरिबांना आणखी वर्षभर मोफत धान्य मिळू शकेल. नाशिक जिल्ह्यात ३६ लाख २२ हजार ११० इतक्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत मोफत धान्य मिळेल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली.
जिल्ह्यात जानेवारी २०२३ मध्ये अंत्योदय योजना व प्रधान्य कुटुंब योजनेचे एकूण सात लाख ९५ हजार ७८ शिधापत्रिकाधारक असून, त्यावर ३६ लाख २२ हजार ११० लाभार्थी आहेत.
अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरित केल्या जाणाऱ्या अन्नधान्यांचा लाभ हे लाभार्थी घेत असून, त्यांना तीन रुपये प्रतिकिलो या दराने तांदूळ व दोन रुपये प्रतिकिलो या दराने गहू वितरित होतो.
कोरोना काळात मोफत दिले जाणारे अन्नधान्य डिसेंबर २०२२ पासून बंद करण्यात आले होते. आता या शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम अंतर्गत अंत्योदय योजना व प्रधान्य कुटुंब योजनेचे विकत मिळणारे धान्य १ जानेवारीपासून ३१ डिसेंबरपर्यंत (पूर्ण वर्षभर) मोफत दिले जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना रेशन दुकानातून धान्य घेताना दुकानदाराला त्यांना मिळणाऱ्या अन्नधान्याच्या बदल्यात पैसे देण्याची आवश्यकता नाही.
तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमांतर्गत मोफत मिळणाऱ्या या धान्याबाबत लाभार्थ्यांनी रेशन दुकानदाराकडून पावती मागून घ्यावी, तसेच याबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी संबंधित तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन श्री. नरसीकर यांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.