
Agriculture Electricity News पळसदेव, ता. इंदापूर ः थकीत वीजबिल (Electricity Bills) वसुलीसाठी उजनी धरणाच्या (Ujani Dam) लाभक्षेत्र परिसरातील सुमारे १५० रोहित्र (Transformer) काढण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांची पिकांना पाणी (Agriculture Irrigation) देण्यासाठी तारांबळ उडाली आहे.
वीजपुरवठा खंडित केल्याने पिकांना पाणी देता येत नाही. एकीकडे उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे झाले आहे. दुसरीकडे वीजबिलांच्या वसुलीसाठी वीज कापण्याची भूमिका वीज कंपनीने घेतल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे.
उन्हाळ्यातील चाऱ्याची गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांनी चारा पिकांची पेरणी केली आहे. काहींनी कांदा, भाजीपाला यासारखी नगदी पिके घेतली आहेत.
याशिवाय तोडणी झालेल्या उसाच्या खोडव्याला व फळबागांनाही पाण्याची अत्यंत गरज आहे. उजनीत पाणी आहे, परंतु ते शेतात नेता येत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे.
सहा एकर शेतात कांद्याचे पीक घेतले आहे. त्याला पाण्याची गरज असताना वीज कापल्याने पिकाचे नुकसान होणार आहे. वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभाराचा आम्हाला अनुभव आला आहे.
वीजबिलांचे वाटप केलेले नसताना, वसुलीसाठी मात्र रोहित्र सोडविण्याची तत्परता त्यांनी दाखविली आहे. आम्हाला हातातले काम सोडून लोणी देवकर येथून वीजबिल घ्यावे लागले.
प्रतिहॉर्सपॉवर एक हजार रुपये याप्रमाणे साडेसात हजार रुपये भरले आहेत. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कर्मयोगी कारखान्याला ७०० टन ऊस गाळपासाठी दिला आहे. अद्यापपर्यंत एक रुपयाही बिल मिळाले नाही.
वीज कंपनीने मात्र नेमकी तिसऱ्या महिन्यात वीज कापली. आता हजारो रुपये बिल कसे भरायचे, असा सवाल रुई येथील शेतकरी सुनील भोसले यांनी उपस्थित केला.
वरिष्ठांच्या आदेशान्वये वीजबिलांच्या वसुलीसाठी १५० रोहित्र काढली आहेत. टप्प्याटप्प्याने सुमारे ६०० रोहित्र काढण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी चालू बिल भरल्यास तत्काळ रोहित्र जोडण्यात येतील. यामुळे शेतकऱ्यांनी चालू बिल भरण्याचे आवाहन त्यांनी केले.
- पी. सी. जाधव, प्रभारी उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी
...अन्यथा रस्त्यावर उतरू ः आमदार भरणे
कोरोना महामारी मुळे सलग २ ते ३ वर्षे राज्य सरकारच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला होता. मात्र आता परिस्थिती सुधारली असून, राज्य सरकारचे उत्पन्नही वाढले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना वीजबिले भरण्याची सक्ती न करता संपूर्ण वीजबिल माफ करावे.
त्याचप्रमाणे चालू बिलात हप्ते निर्धारित करून द्यावेत. अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुक्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.