Pomegranate
PomegranateAgrowon

डाळिंबाच्या मृग ऐवजी आंबिया बहराला पसंती

सांगली ः देशात यंदा डाळिंबाचा (Pomegranate) मृग बहर धरण्यासाठी शेतकरी नियोजन करत आहेत. मात्र देशातील अनेक भागांत एप्रिल महिन्यात पाऊस झाल्याने बागांना ताण बसला नाही. त्यातच पीन होल बोअरचे (खोडकीड) संकटही कमी झाले नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. मृग बहराऐवजी आंबिया बहराकडे (Ambiya Blossem) शेतकरी वळाले आहेत. परिणामी, मृग बहरातील डाळिंबाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता असून, क्षेत्र जूलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत स्पष्ट होईल. यंदाच्या मृग बहराचे (Mrug Blossem) क्षेत्र घटेल, असा अंदाज डाळिंब संघाने व्यक्त केला आहे.

देशात मृग बहराखाली अंदाजे १ लाख हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र येते. मृग बहर जून महिन्यानंतर धरला जातो. पाणी आणि पडणारा पाऊस याचा अंदाज घेऊन मृग हंगाम धरला जाऊ लागला आहे. यंदा आगाप मृग बहर मे-जून महिन्यात शेतकऱ्यांनी धरण्याचे नियोजन केले आहे. तर बहुतांश ठिकाणी पाणी उपलब्ध असल्याने मृग बहर धरण्यासाठी दीड महिन्यापूर्वी हलकी छाटणी करून बोर्डो आणि ०-५२-४३ च्या फवारणी चालू आहेत. खोडकिडींवर कीटकनाशकांची पेस्ट झाडांच्या खोडांना लावण्याचे काम चालू आहे. अनेक बागांत मुख्य छाटणी करून अंतर्गत मशागत, शेण खते घालून बेड तयार करण्याची कामे सुरू केली आहेत.

दरम्यान, गतवर्षी देशात १ लाख हेक्टरवर मृग बहर होता. मात्र वर्षभरात खोडकीडीच्या प्रादुर्भावामुळे बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा काढून टाकल्या आहेत. परिणामी, मृग बहरातील डाळिंबाचे क्षेत्र घटू लागले आहे. गेल्या तीन वर्षांपासून मृग बहर धरल्यानंतर अतिवृष्टी, तेलकट रोगामुळे फटका डाळिंब पिकाला बसला असल्याने गतवर्षी ८० हजार हेक्टरवर मृग बहर धरला होता. सध्या शेतकरी चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत आहे. चांगला पाऊस झाल्यानंतर देशातील कोरडवाहू भागात मृग बहर धरला जाईल. मात्र यंदाच्या हंगामात मृग बहारातील क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.

आंबिया बहराचे क्षेत्र वाढले
मृग हंगामातील डाळिंबावर सातत्याने संकट येत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या साऱ्यामुळे शेतकरी मृग बहर धरण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र आहे. डाळिंबावर नैसर्गिक संकटामुळे शेतकरी मृग बहर धरण्याऐवजी आंबिया बहराकडे वळत आहे. त्यामुळे आंबिया बहराचे क्षेत्र वाढले असल्याचे संघाने सांगितले आहे.

कोट ----
देशात मृग बहर धरण्यासाठी शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहे. मात्र डाळिंबावरील संकटे कमी झालेली नाहीत. त्यामुळे या बहारातील क्षेत्र घटेल, अशी शक्यता आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चित्र स्पष्ट होईल.
- प्रभाकर चांदणे,
अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com