सोलापूर ः राष्ट्रीय महामार्ग (National Highway) ६५२ नळदुर्ग ते अक्कलकोट रस्त्याची भूसंपादन (Land Acquisition) प्रक्रिया ही अयोग्य पद्धतीने कायदा धाब्यावर बसून न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करून सुरू आहे. रस्ते कामास विरोध नाही, मात्र बळजबरीने जमिनी घेतल्या जात आहेत, असा आरोप या महामार्गावरील अक्कलकोट आणि तुळजापूर तालुक्यातील शेतकरी दिलीप जोशी, सदाशिव ठाकूर यांनी सोलापुरात शनिवारी (ता.१२) पत्रकार परिषदेत केला.
या महामार्गावरील जवळपास १८० शेतकऱ्यांची १५० एकर जमीन या रस्त्यासाठी बेकायदा पद्धतीने वेळोवेळी ताब्यात घेण्यात आली. शेतकऱ्यांनी कायदेशीर पद्धतीचा मार्ग अवलंबावा अशी मागणी केली असता, त्यांच्यावरच सरकारी कामात अडथळा आणला, असे आरोप ठेवून पोलिसांच्या मदतीने गुन्हे दाखल करण्यात आले.
गेली पाच वर्षे या विरोधात अक्कलकोट तालुक्यातील तसेच तुळजापूर तालुक्यातील ग्रामस्थ लढा देत आहेत. न्यायालयाने या प्रकरणी लक्ष घातलं, शेतकऱ्यांवर अन्याय करू नका, असे राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच या प्रकरणात सोलापूर आणि उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही तातडीने लक्ष घालून योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे व्याजासह मिळवून द्यावा, असे आदेशही दिले आहेत. पण दोन्ही जिल्हाधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असं जोशी आणि ठाकूर म्हणाले.
राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलिस या सर्वांनी मिळून या गावातील सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीवर एक प्रकारे डल्लाच मारला आहे. न्यायालयाचेही कोणी ऐकत नाही आता न्याय तरी कोणाकडे मागायचा, असा सवालही या शेतकऱ्यांनी केला. यावेळी बुद्धिसागर नाईक, नागनाथ बदे यांच्यासह चुंगी, हन्नूर, चपळगाव परिसरातील शेतकरी
उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.