
Akola News : जिल्ह्यात पीकविमा काढण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आयसीआय लोम्बार्ड या विमा कंपनीने कामात दिरंगाई केली.
शेतकऱ्यांना पीकविम्याच्या लाभापासून वंचित ठेवल्याप्रकरणी या कंपनीस काळ्या यादीत टाकण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.
दरम्यान अद्यापही शेतकऱ्यांचे विमा दावे प्रलंबित असल्यास हे दावे ५ जून पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.
पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीपोटी देण्यात आलेले विमा भरपाई मोबदला देण्यासाठी करावयाची प्राथमिक चौकशी, झालेल्या नुकसानीचे पंचनामे, शेतकऱ्यांचे पीकविमा दावे काढण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड या कंपनीची शासनातर्फे नियुक्ती झाली होती.
तथापि, शेतकऱ्यांना प्रतिसाद न देणे, दिरंगाई करणे, मनुष्यबळाची उपलब्धता नसणे, अशा कारणास्तव जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी या कंपनीस काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी शिफारस शासनाकडे केली आहे.
सोमवारी होणारी बैठक आता ५ जूनला
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात दर सोमवारी बैठक घेण्यात येते. ही बैठक आगामी दोन सोमवार म्हणजेच २२ व २९ मे रोजी काही अपरिहार्य कारणास्तव होणार नाही. ही बैठक सोमवार (ता. पाच जून) पासून नियमित वेळेवर सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होईल.
खरीप बैठकीत चर्चा---
पीकविमा कंपनीच्या कारभाराची नुकत्याच झालेल्या खरीप आढावा बैठकीदरम्यान चर्चा झाली होती. त्यावेळी लोक प्रतिनिधींनी या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव दिला का, असे विचारले होते.
त्यानंतर जिल्हा प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेत शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. शिवाय यापूर्वी या विमा कंपनीविरुद्ध पोलिसात तक्रारही दाखल झालेली आहे. त्या प्रकरणाची चौकशी होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.