
पुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरण (Cloudy Weather) झाले आहे. राज्यात पावसाला (Rainfall) पोषक हवामान होत असून, उद्यापासून (ता. ९) तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज (Rain Forecast) हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातील थंडी गायब झाली आहे. राज्याच्या तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा वाढू लागला आहे. राजस्थानातील चुरू येथे बुधवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मात्र थंडी नाहीशी झाली आहे. दिवसा ढगाळ हवामानासह उकाडा चांगलाच वाढू लागला आहे.
बुधवारी (ता.७) गडचिरोली येथे राज्यातील नीचांकी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३५.५ अंश तापमान नोंदले गेले. उपसागरातील वादळी प्रणालीमुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात ढगाळ वातावरण आहे. उद्यापासून कोकण, तर शनिवारपासून (ता. १०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तर रविवारपासून (ता. ११) विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पूर्व किनाऱ्यावर ‘मनडुस’ चक्रीवादळ
बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. ही प्रणाली कारईकलपासून पूर्वेकडे ६७० किलोमीटर, तसेच चेन्नईपासून ७५० किलोमीटर आग्नेयेकडे होती.
बुधवारी (ता. ७) रात्री या प्रणालीचे ‘मनडुस’ चक्रीवादळात रूपांतर झाले. आज (ता. ८) सकाळपर्यंत ही वादळी प्रणाली उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकणार आहे. पूर्व किनाऱ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.