
जळगाव : खानदेशात मंगळवारी (ता. १३) पावसाने हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकांच्या नुकसानीची (Rabi Crop Damage) भीती आहे. शेतकरी चिंतेत असून, कोरड्या, निरभ्र वातावरणाची (Dry Weather) गरज आहे. जळगाव जिल्ह्यात भुसावळ, जळगाव, पाचोरा, भडगाव आदी भागात मध्यम व हलका पाऊस (Rainfall) झाला. जळगाव तालुक्यातील तरसोद यांसह विविध भागांत जोरदार पाऊस झाला.
धुळ्यातही शिरपूर, शिंदखेडा भागात हलका पाऊस काही भागात झाला. तर नंदुरबारमध्येही मंगळवारी सकाळपासून काही भागात हलका, तुरळक पाऊस झाला. मंगळवारी सर्वत्र सकाळपासून ढगाळ वातावरण होते. कुठेही सूर्यदर्शन झालेले नाही. मागील तीन - चार दिवस थंडी गायब आहे. दुपारी उघडा जाणवत होता. गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाला असून, तापमानात वाढ झाली आहे.
तीन दिवसांपूर्वी कृषी विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला होता. तसेच शेतमालाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले होते. कुठेही अतिजोरदार पाऊस किंवा गारपीट मंगळवारी झाली नाही. परंतु या पावसाने फवारणी, मका, केळी पिकातील तणनियंत्रण, पपई, केळीच्या काढणीवर परिणाम झाला आहे. पावसामुळे काळ्या कसदार जमिनीतील कोरडवाहू हरभरा पिकाचे नुकसान होत आहे. हरभरा पिकात शेंडे करपणे, मर रोग दिसत आहे. तसेच किडींचा प्रादुर्भावही मका, हरभरा पिकात वाढू शकतो.
केळी, कापूस दरांवरील दबाव वाढेल?
केळीची काढणी काही भागात सुरू आहे. ही काढणी पावसाळी वातावरणाने रखडली आहे. खरेदीदार काढणी टाळत आहेत. तसेच पपईची काढणीदेखील खरेदीदारांनी टाळली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. कारण गारपीट किंवा पाऊस अधिक झाल्यास काढणी पुढे काही दिवस रखडून नुकसान होईल. पपई, केळी, कापूस दरांवरील दबाव वाढेल, असाही मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.