सिंधुदुर्गनगरी ः सावंतवाडी, बांद्यासह जिल्ह्याच्या अन्य भागांना अवकाळी पावसाने (Untimely Rain) शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी चांगलेच झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे (Rain Update) अनेकांची तारांबळ उडाली. दरम्यान, गेले दोन- तीन दिवस असलेले ढगाळ वातावरण (Cloudy Weather) आणि पडलेल्या पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात आधी तीन-चार दिवस कडाक्याची थंडी होती. त्यानंतर गेले तीन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिले. अनेक भागांत तर सूर्यदर्शनदेखील झालेले नाही. काही भागांत हलका पाऊस देखील दोन दिवसांपूर्वी झाला. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती होती.
दरम्यान, सायंकाळी साडेतीन वाजल्यापासून बांदा येथे जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सावंतवाडी, कुडाळ, ओरोस, हुमरमळा, कणकवली या भागांत देखील पावसाला सुरुवात झाली. काही भागांत वाऱ्याचा वेग अधिक होता. सावंतवाडी आणि बांद्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या केरळ राज्याच्या समुद्र किनाऱ्यावर वातावरणाच्या खालच्या स्तरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले आहे. त्यामुळे त्याच्या प्रभावाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेकडील तालुक्यांत पाऊस पडण्याचा अंदाज दिला होता. आजही काही भागांत पावसाचा अंदाज आहे.
कीड-रोगांच्या प्रादुर्भावाची भीती
या पावसामुळे आंबा, काजू हंगाम संकटात सापडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. गेले काही दिवस असलेले ढगाळ वातावरण आणि पडलेला पाऊस यामुळे आंबा, काजूवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदारांची धास्ती वाढली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.