
जळगाव ः खानदेशात मागील दोन दिवसांपासून पावसाने (Rain Update Khandesh) उसंत घेतली आहे. काळ्या कसदार जमिनीत अद्याप वाफसा स्थिती नाही. परंतु हलक्या, मध्यम जमिनीत बैलजोडीकरवी आंतरमशागत, फवारणी (Spraying), तणनियंत्रण (Weed Control) आदी कामे सुरू झाली आहेत.
खानदेशात गिरणा, तापी, गोमाई, सुसरी, पांझरा, अनेर नदीकाठच्या भागात काळी कसदार जमीन आहे. या क्षेत्रात आंतरमशागतीला वाफसा झालेला नाही. आणखी तीन ते चार दिवसांत या क्षेत्रातही वाफसा होईल. मागील दोन दिवसांपासून ऊन-सावली, असा खेळ आहे. रात्री उकाडा होतो. सकाळी सुसाट वारा असतो. शेतकरी पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करीत होते. सलग २५ ते २७ दिवस पाऊस सुरूच होता.
मजूरटंचाई कायम आहे. यामुळे कापूस, सोयाबीन आदी पिकांत तणनियंत्रणासाठी तणनाशकांचा उपयोग वाढला आहे. कापूस पिकात कीडनाशके, बुरशीनाशके, संप्रेरकांची फवारणी अद्याप अपवाद वगळता शेतकऱ्यांनी घेतलेली नाही. सततच्या पावसात पीकहानी झाली, तसेच तणही वाढले. तण काढून पीक व्यवस्थित स्थितीत आणण्यावर शेतकऱ्यांची ऊर्जा, निधी खर्च होत आहे.
बैलजोडीकरवी आंतरमशागत वेगात सुरू आहे. अनेक शेतकरी भाडेतत्त्वावर बैलजोडी घेत आहेत. त्यासाठी १२०० रुपये रोज, अशी मजुरी शेतकऱ्यांना लागत आहे. एका दिवसात किमान तीन एकर क्षेत्रात बैलजोडीकरवी आंतरमशागत करून घेतले जात आहे.
मजूरटंचाईचा प्रश्न
खतांची मात्राही शेतकरी सध्या फारशी देताना दिसत नाहीत. यातच १०.२६.२६, डीएपी या खतांची टंचाई आहे. यामुळे अडचणी अधिक आहेत. मजूरटंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांना इतर गावांमधून मजूर आणावे लागत आहेत. त्यासाठी मजूर वाहतूक खर्चही शेतकऱ्यांना द्यावा लागत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.