अकोला ः तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथील अनेक शेतकऱ्यांना नुकसान होऊनही पीकविम्याची मदत मिळाली नसल्याने शेतकरी मंगळवारी (ता.२०) येथील जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयावर धडकले. महिला व पुरुषांनी अधीक्षकांच्या कक्षासमोर ठिय्या दिल्याने एकच खळबळ उडाली. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर तसेच महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु करण्यात आले.
जिल्ह्यात या हंगामात परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे, असे असतानाही अनेक शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी मदत मिळाली. काहीजणांना तर भरलेल्या पीक विम्याचा प्रीमियम सुद्धा हातात पडला नाही. त्यामुळे शेतकरी पिक नुकसानीची योग्य मदत मिळण्याची मागणी करीत आहेत.
आंदोलनात किरण कौठकर,अमोल मसूरकर ,दिनेश गिरे, अनिल मानकर, नितीन राखोंडे, अजय मानकर, नंदू मानकर, राम किशोर थुटे, पंकज इंगळे, दिनेश देऊळकर, गोपाल निमकर्डे, गोदावरी इंगळे यांच्यासह शेकडो शेतकरी, महिला सहभागी झाले होते. विमा कंपनी जिल्हा व्यवस्थापक प्रभास यांनी १५ डिसेंबरपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र काहीच न झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. बराच वेळ शेतकरी अधीक्षकांच्या चेंबरसमोर ठाण मांडून होते.
पीकविम्यासाठी २३ पर्यंत मुदत
विमा कंपनी प्रतिनिधी व जिल्हा अधीकक्ष कृषी अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे तसेच आंदोलकांमध्ये चर्चा झाली. शुक्रवार (ता.२३) पर्यंत अडगाव येथील २९४ शेतकऱ्यांची प्रकरणे मार्गी लावण्याची मुदत देण्यात आली. अन्यथा शनिवारी (ता.२४) पुन्हा ठिय्या देणार असल्याची माहिती लक्ष्मीकांत कौठकर यांनी दिली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.