
नंदुरबार : जिल्ह्यातील रंगावली, प्रकाशा, सारंगखेडा मध्यम प्रकल्प, ३३ लघू प्रकल्प, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ६, वळण बंधारे २० असे एकूण ६२ व जिल्ह्यातील अधिसूचित नदी-नाले यात मुबलक जलसाठा (Water Storage) आहे. बागायतदारांनी रब्बी हंगामाकरिता (Rabi season) ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे, आवाहन करण्यात आले आहे.
बागायतदारांनी आपले नमुना नं. ७, ७ (अ), ७ (ब) चे पाणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात सादर करावेत. बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल. बागायतदारांनी शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरीबाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेऊन नंतरच मंजुरी अथवा नामंजुरीचा विचार करण्यात येईल.
मंजुरी व पाणीपुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा, डाळी, कपाशी, भुईमूग व इतर हंगामी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रीतसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी दरसाल दर शेकडा १० टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे.
लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून ३५ मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना ७ (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्ज क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पद्धतीने पाणी देण्यात येईल, असे धुळे पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता एन. एम. व्हट्टे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.