
Agriculture News : ‘‘डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या (BSKKV) शिरगाव येथील भात संशोधन केंद्राने (Paddy Research Center) संशोधित केलेली ‘रत्नागिरी-८’ ही भाताची जात (Paddy Verity) कोकणातील हवामानात चांगले उत्पादन देते.
या जातीचे हेक्टरी ५५ ते ६० क्विंटल उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांचा या जातीच्या लागवडीकडे कल वाढला आहे,’’ असा दावा फोंडाघाट संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विजय शेट्ये यांनी केला आहे.
डॉ. शेट्ये म्हणाले,‘‘सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात भात लागवड असते. या तीनही जिल्ह्यांमध्ये लागवडीसाठी पारंपरिक बियाण्यांचा वापर केला जात होता. परंतु गेल्या पंधरा वर्षांपासून संकरित, सुधारित जातींची लागवड वाढली आहे. या जातींना ‘रत्नागिरी-८’ हा चांगला सक्षम पर्याय आहे.’’
डॉ. शेट्ये म्हणाले, ‘‘कोकणातील बदलत्या वातावरणात ‘रत्नागिरी-८’ ही जात चांगले उत्पादन देते. ही जात १३५ ते १४० दिवसांत तयार होते.
गेल्या दोन वर्षांच्या निष्कर्षातून उशिरा पडणाऱ्या पावसाचा या जातीवर परिणाम होत नसल्याचे दिसून आले आहे. हेक्टरी सरासरी ५५ ते ६० क्विंटल उत्पादन मिळते.
प्रयोगशील शेतकऱ्यांनी या जातीचे ८५ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले आहे.’’
खासगी कंपन्यांचा विद्यापीठाशी करार
‘‘‘रत्नागिरी-८’ चा भाताचा दाणा बारीक आहे. करपा किंवा कडा करपा रोगास प्रतिकारक आहे. मध्यम उंची असल्यामुळे लोळत नाही. गेल्या खरीप हंगाम ३५ टन बियाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विक्री करण्यात आले.
यावर्षी देखील विक्रीचे नियोजन आहे. या जातीची लोकप्रियता पाहून देशातील खासगी कंपन्यांनी विद्यापीठाशी करार केला आहे,’’ असे डॉ. शेट्ये म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.