
अकोला ः आगामी खरीप हंगामाच्या (Kharif Season) पार्श्वभूमीवर सद्यःस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीनचे (Soybean Seed) चांगले दर्जेदार बियाणे उपलब्ध असेल अशा शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी राखून ठेवावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नंदकिशोर माने यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना आवाहन करताना श्री. माने यांनी म्हटले आहे, की शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले सोयाबीन बियाणे बाजारात न विकता योग्य पद्धतीने साठवावे. स्वत:ची गरज भागवून शिल्लक असलेले बियाणे इतर शेतकऱ्यांना उपलब्ध करावे.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षांपर्यंत वापरता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःकडे खरीप हंगामातील राखून ठेवलेल्या घरातीलच सोयाबीन बियाणांचा वापर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली करावा.
सोयाबीन बियाणे साठवणुकीची योग्य पद्धत
स्वच्छ केलेले बियाणे चांगल्या नवीन व गोणपाट पोत्यात साठवावे. मात्र यासाठी प्लॅस्टिक पोत्यांचा वापर टाळावा. पोत्याची थप्पी ठेवताना थंड किंवा ओलावा विरहित, मोकळी हवा असलेल्या जागेत ठेवावी. सोयाबीन बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते.
जिल्ह्यात मागील खरीप हंगामात सोयाबीन पिकाच्या काढणीवेळी पाऊस झाल्याने काही प्रमाणात सोयाबीन बियाणे भिजले आहेत. त्यामुळे सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी घरच्याघरी बियाण्यांची आधी उगवणक्षमता तपासावी. ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये प्रमाणित सोयाबीन बियाणे व नवीन वाणाची पेरणी केली, त्यांनी बियाणे जतन करून ठेवावे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.