
सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात अनेक ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. निकालानंतर मिळालेल्या जागांबाबत राजकीय पक्षांनी दावे-प्रतिदावे केले आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसने १३८ जागा मिळाल्याचा दावा केला असून, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळून २०३ जागा मिळाल्याचा दावा केला आहे.
जिल्ह्यातील ३१९ पैकी २५९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी ८०.१४ टक्के मतदान झाले होते. निकालात राष्ट्रवादीला सातारा, पाटण, कोरेगाव, महाबळेश्वरात धक्का बसला असून, येथे भाजप व शिंदे गट शिवसेनेची सरशी झाली आहे, तर माण, खटाव, फलटण, कऱ्हाड, वाईमध्ये राष्ट्रवादीने वर्चस्व राखले आहे. पाटणमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने सर्वाधिक ५१ ग्रामपंचायतींत वर्चस्व मिळविले, तर २० ग्रामपंचायतींत महाविकास आघाडीने वर्चस्व राखले आहे. फलटणमध्ये २४ पैकी २२ ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाची सत्ता आली, तर भाजपच्या खासदार गटाला दोन ग्रामपंचायती मिळाल्या.
सह्याद्री कदम यांच्या गटाला एक, तर प्रल्हाद पाटील गटाला एक ग्रामपंचायत मिळाली आहेत. वाई, खंडाळा व महाबळेश्वरमध्ये ग्रामपंचायतींची संख्या कमी होती, तरी महाबळेश्वरमध्ये शिंदे गट शिवसेनेने वर्चस्व मिळविले आहे. वाई, खंडाळ्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. सातारा व जावळी तालुक्यांत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या स्थानिक गटाने वर्चस्व राखले आहे. त्यांच्या गटाने जावळी तालुक्यातील १५ पैकी १४ सत्ता मिळवून करिष्मा ठेवला आहे.
माणमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या गटाने १५ ग्रामपंचायतींत वर्चस्व राखले असून, राष्ट्रवादीला नऊ, ठाकरे गट शिवसेनेला दोन, अपक्षांना एक, तर महाविकास विकास आघाडीची तीन ग्रामपंचायतींत सत्ता आली आहे. कोरेगावात शिंदे गट शिवसेनेचे आमदार महेश शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटात लढती झाल्या. यामध्ये ४३ पैकी ३१ ग्रामपंचायतींवर महेश शिंदेंच्या गटाने दावा केला आहे, तर आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाने २७ ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीच्या गटाने वर्चस्व मिळविल्याचा दावा केला आहे.
वाई तालुक्यात आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सहा ग्रामपंचायतींत निर्विवाद वर्चस्व मिळविले.
दिग्गजांच्या सत्ता कायम
भुईंज ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या लढतीत माजी आमदार मदन भोसले समर्थकांच्या सत्तारूढ भाजप पॅनेलने सत्ता कायम राखली. कऱ्हाड तालुक्यात भाजपच्या अतुल भोसले गटाला रेठरे खुर्द आणि आटके या हक्काच्या गावातच फटका बसला, तर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील, कॉँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर गटाची बहुतांश गावातील सत्ता कायम राहिली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.