भोंगा, हनुमान चालिसा नव्हे; शाळा, रुग्णालये महत्त्वाची

राज्यमंत्री बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर टीका
Bachhu Kadu
Bachhu KaduAgrowon

अमरावती ः कुणाचा भोंगा कुठे वाजवावा आणि हनुमान चालिसा कुठे म्हणावी, की म्हणू नये, यातच काही नेत्यांची शक्ती खर्ची पडत आहे. हनुमान चालिसा वाल्यांनी विनाकारण गोंधळ करण्यापेक्षा शाळा आणि रुग्णालये मजबूत करण्यासाठी आपली शक्ती खर्ची घातली असती, तर लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं असतं, असे म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली.

अमरावती येथे रविवारी (ता. १५) बुधभूषण ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात राज्यमंत्री कडू म्हणाले, की दोन वर्षे कोरोनाचा काळ बघितल्यानंतर आपले रुग्णालये कसे मजबूत होतील, आपल्या शाळा कशा मजबूत होतील, यावर आज काम करणे गरजेचे आहे. त्या दोन वर्षांच्या वेदनांतून तुम्ही बाहेर पडून हनुमान चालिसावर राजकारण करत असाल तर हे तुमच्या राजकारणाचे अपयश आहे. अशा मुद्द्यांपेक्षा विकासाचे मुद्दे नेत्यांनी समोर आणले पाहिजे. आजही आपले रुग्णालये संपन्न नाहीत. इर्विन हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितले तर एका बेडवर दोन रुग्ण झोपलेले आढळतात. त्यामुळे आरोग्य व्यवस्था बळकट करणे गरजेचे आहे. कुणाचा भोंगा कुठे वाजवावा, हे महत्त्वाचे नाही, असे म्हणत बच्चू कडूंनी राज ठाकरेंसह विरोधी पक्षालाही टोला लगावला.

महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी नेत्यांनी हॉस्पिटल दत्तक घेतले पाहिजे, असे सांगत मराठा सेवा संघ आणि प्रहार दोघांनी मिळून एखादे हॉस्पिटल दत्तक घेऊ आणि एक नवीन विचार देशासमोर घेऊन जाऊ, असे बच्चू कडू म्हणाले. सेवा हाच खरा धर्म आहे. आपले राज्य हे छत्रपतींचे राज्य आहे. त्यांनी तलवार चालवली, रक्त सांडले. पण मन मात्र हळवं होतं. सामान्य लोकांप्रति छत्रपतींची आस्था तेवढीच मजबूत होती. शेतकऱ्याच्या पिकाच्या देठालाही हात लावू नका, असे सांगणारा हा जगातला पहिला राजा होता. कारण त्याला सेवेचा आधार होता. राज्य कुणाच्या नावाने आहे, हे फार महत्त्वाचे नाही. या परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य फार महत्त्वाचे आहे. ते म्हणायचे, ‘सर्वप्रथम आम्ही भारतीय आहोत’. आज हाच विचार देशासाठी महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले.

-

राज्य कुणाचे?

आज कुणी म्हणतं की, औरंगजेबाचे राज्य आहे, मोदींचे राज्य आहे, तर कुठे उद्धव ठाकरेंचे राज्य असे म्हटले जाते. पण छत्रपतींचं राज्य हे रयतेचं राज्य होतं, हे आपल्यासाठी आज महत्त्वाचं आहे. हे रयतेचे राज्य आहे, रयतेसाठी आहे आणि रयतेसाठीच आम्ही काम केले पाहिजे, असेही राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com