
नागपूर : ‘‘देश ऊर्जेच्या बाबतीत (Energy Self Sufficiency) स्वयंपूर्ण झाला पाहिजे. ऊर्जा ही आजच्या काळाची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर नॅशनल हायड्रोजन मिशनवर (National Hydrogen Mission) काम सुरू आहे. या क्षेत्रात संशोधनासाठी पुढे यावे,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात आयोजित ‘इंडियन सायन्स काँग्रेस’च्या उद्घाटन प्रसंगी ते मंगळवारी (ता.३) बोलत होते. मोदी यांनी दृकश्राव्य माध्यमातून सायन्स काँग्रेसमध्ये भाग घेतला.
मोदी म्हणाले, ‘‘विज्ञानात पॕशनसोबत देशाच्या सेवेचा संकल्प जोडतो. त्याचे परिणाम अद्भुत असतात. एकविसाव्या दशकात विज्ञानधिष्ठीत लोक भारताला एका उंचीवर नेतील यात शंका नाही. निरीक्षण हे विज्ञानाचे मूळ आहे.
त्या आधारे निष्कर्ष काढून कोणत्याही तथ्यावर पोहोचता येते. पीएचडीधारकांच्या संख्येत जागतिकस्तरावर पहिल्या तीनमध्ये समाविष्ट असलेल्या देशात भारत आहे. ही मोठी उपलब्धी आहे. मात्र हे संशोधन सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘लॅब टू लँड’ अशा प्रकारचे धोरण राबविणे आवश्यक आहे.’’
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देशाने विज्ञान क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. कधीकाळी ३५० इतके अत्यल्प स्टार्टअप होते. आज स्टार्टअपची संख्या ८० हजारांवर पोहोचली आहे. स्टार्टअपच्या बाबतीत देश तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. अंतराळ विभाग भारताच्या आर्थिक क्षेत्रात योगदान देत असल्याचे पहिल्यांदाच घडले आहे.
इस्रोच्या माध्यमातून विदेशी सॅटेलाइट लॉन्च केले जात आहेत. त्यांची संख्या ३८६ इतकी झाली आहे. यातील ९० टक्के सॅटेलाईट लॉन्चचे काम पंतप्रधान मोदी यांच्या काळात झाले आहे. २२२० मिलियन युरो यातून देशाला मिळाले. देशातील प्रतिभेला प्रोत्साहन देणारे वातावरण मोदी यांच्या कार्यकाळात विकसित झाले. येत्या काळात शाश्वत संशोधनावर भर द्यावा लागेल. त्याकरिताचा रूट मॅप वैज्ञानिकांनी तयार करावा.’’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘संशोधनाला चालना देण्याचे काम महाराष्ट्र सरकारने नेहमी केले. टेक्नोसेव्ही नव्या पिढीत वैज्ञानिक गुण आहेत. कौशल्यावर आधारित मनुष्यबळ विकसित करण्यासाठी सरकार देखील प्रयत्न करत आहे. यातून संशोधनाला चालना मिळेल.’’ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील यावेळी विचार व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‘इंडियन सायन्स काँग्रेस’च्या अध्यक्षा डॉ. विजयालक्ष्मी सक्सेना या वेळी उपस्थित होत्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाला शंभर वर्षे झाल्यानिमित्त या वेळी खास टपाल तिकिटाचे विमोचन करण्यात आले. तसेच ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.
‘गरजेवर आधारित प्रांतनिहाय संशोधन व्हावे’
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ‘‘देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ६५ टक्के लोकसंख्या गाव-खेड्यांत राहते. परिणामी गावांच्या विकासासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल, यावर काम व्हावे. त्याकरिता गरजेवर आधारित प्रांतनिहाय संशोधन व्हावे. निर्यात कमी करून आयात वाढवावी लागेल. या कामातही तंत्रज्ञानाचा वापर व्हावा. त्याशिवाय अर्थव्यवस्था बळकट होऊ शकत नाही.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.