
मुंबई : देशातील राजकारणात (Politics) वाईट परंपरा आणि चाली सुरू झाल्या आहेत. त्या संपविण्यासाठी ठाकरे आणि आंबेडकर (Thackeray Ambedkar Alliance) यांची पिढी काम करेल, असे सांगत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या (Shivsena VBA Alliance) युतीची घोषणा सोमवारी (ता. २३) येथे करण्यात आली. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) आणि ‘वंचित आघाडी’चे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीकाही केली.
सत्तेच्या राजकारणात कुणीही अमरपट्टा घेऊन आलेले नाही, त्यामुळे मोदी पर्वाचाही अस्त होणार आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केली. या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, की ‘शिवशक्ती’, ‘भीमशक्ती’चा याआधीही प्रयोग झाला आहे. पण प्रकाश आंबेडकर आणि आम्ही प्रथमच एकत्र आलो आहोत.
आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. माझे आणि त्यांचे आजोबा स्नेही होते. वाईट गोष्टींवर त्यांनी प्रहार केले. सध्याच्या राजकारणात काही वाईट परंपरा आणि चाली सुरू आहेत, त्या मोडून काढण्याचे काम या दोन महामानवांचे वारसदार करतील.
आमचे सहकारीही हुकुमशाही वाटचालीला आव्हान देतील. सध्या लोकांना नको त्या वादात अडकवून टाकले आहे. भ्रम पसरवला जात आहे.
हुकूमशाहीची वाटचाल अशीच चालते. एका वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास घेण्यासाठी आणि देशाला दिशा देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. संविधानाचे महत्त्व आणि पावित्र्य राखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
आम्ही राजकीय वाटचालीत संवाद ठेवत पुढे जाऊ. सध्या जे सुरू आहे ते तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. पंतप्रधान मुंबईत आले तेव्हा सभेला कोण कुठून आले हे सगळ्यांना माहीत आहे.
निवडणुका आल्या की गरिबांचा उदो उदो करायचा आणि गरिबांनी मते दिली की मात्र, त्यांना झिडकारायचे असा प्रकार सुरू आहे. निवडणुकीनंतर गरीब रस्त्यावर आणि यांची उड्डाणे सुरू, असा प्रकार आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, की गेली काही वर्षे आम्ही उपेक्षितांचे राजकारण करत आहोत. आम्ही जी चळवळ चालवत होतो तिला आमच्या मित्रपक्षांनी गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. आम्ही आंदोलने करत राहिलो, लढत राहिलो.
निवडणुकीत निवडून देणे हे मतदारांच्या हातात आहे. पण उमेदवार देणे हे पक्षांच्या हातात आहे. उमेदवारीच्या रूपाने सामान्य माणसाचे सार्वत्रिकीकरण होईल हे आमचे सूत्र आहे. या देशातील सत्ता १६९ कुटुंबांच्या हातात आहे.
त्यात १० कुटुंबांची भर पडली आहे. त्यामुळे गरिबांचे राजकारण बाजूला पडले असून भांडवालदार, लुटारूंचे राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे नव्याने गोष्टी मांडण्याची गरज आहे.
मोदी पर्वाचाही अंत होणार
पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना आंबेडकर म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपमधील नेतृत्व संपविले आहे. मोदी पर्वाचा अंत होणार नाही, असे अनेकांना वाटते. पण कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही.
आम्ही आमचे राजकारण मुद्देसूद आणि नीतीमत्तेवर करू. शरद पवार यांच्यासोबत आमचे जुने भांडत आहे. ते शेताचे भांडण नाही, ते नेतृत्वाचे भांडण आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याबरोबर येतील, अशी अपेक्षा आहे.’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.