ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः यंदाच्या मोसमात पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका दिला. खरीप हंगामातील पिकांचे जसे नुकसान झाले तसाच फटका सीताफळ उत्पादकांनाही बसला. जुलैत झालेल्या संततधार पावसाने यंदा सीताफळ बागांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात फ्रुटींग न झाल्याने उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट आली. कोरोनामुळे गेले दोन हंगाम नुकसान झेललेल्या सीताफळ उत्पादकांना यंदा ही पावसाने पदरात नुकसान दिले. सलग तिसरा हंगाम आता तोट्याचा ठरला आहे.
राज्यात दरवर्षी विस्तारत असलेल्या सीताफळाला बाजारात मागणी चांगली आहे. कमी पाण्यात तसेच हमखास उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांचा सीताफळ लागवडीकडे कल वाढला. त्यामुळेच या फळाचे क्षेत्र एक लाख हेक्टरपर्यंत विस्तारले. डोंगरदऱ्यात आढळणाऱ्या सीताफळाचेही क्षेत्र वेगळे आहे. यामुळे दरवर्षी दिवाळीदरम्यान सीताफळाची बाजारपेठेत रेलचेल दिसून येते.
यावर्षी सतत झालेला पाऊस व काही वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे सीताफळ उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. अतिवृष्टीमुळे फळ धारणेवर परिणाम होऊन फळाची संख्या कमी झाली. शिवाय अतिपावसामुळे फळाचा आकार मोठा झाला नाही. याचा परिणाम बागेतील उत्पादनावर झालेला आहे. दरवर्षी एका हेक्टरमध्ये ज्या बागेत ८०० ते ९०० क्रेट सीताफळ निघायचे, त्याच बागेत यंदा ४०० ते ५०० क्रेटपर्यंत फळे मिळत आहेत. बाजारात चांगल्या दर्जाच्या फळांना ७० ते ८० रुपयांपेक्षा प्रतिकिलोला दर आहे. मात्र, हा माल अत्यंत कमी प्रमाणात निघत आहे. दुय्यम दर्जाची फळे अवघी ३० रुपयांपर्यंत प्रतिकिलो विकत आहेत. वास्तविक यंदा बाजारात गेल्या हंगामाच्या तुलनेत सुमारे २० ते २५ टक्के दर अधिक असल्याचे उत्पादक सांगत आहेत. यंदा सीताफळाचा पल्पसुद्धा हंगामात १८० रुपयांपर्यंत विकत आहे. गेल्या वर्षी हाच दर १३० रुपयांपर्यंत होता. पल्प तयार करण्यासाठी फळांची कमतरता भासू लागली आहे, असल्याचे सांगण्यात आले.
प्रतिक्रिया...
मागील दोन वर्षांत कोरोनामुळे सीताफळाची विक्रीच न झाल्याने भाव मिळाले नाहीत. चालू हंगामात शेतकऱ्यांना सीताफळ बागेतून पैसा मिळण्याची आशा होती. परंतु सततच्या पावसामुळे सीताफळाचा आकार लहान राहिला. एकूण उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. निसर्गापुढे शेतकरी हतबल ठरला. माल नसल्याने भाव दिसत असूनही तो हताश आहे.
- रमेश निकस, सीताफळ उत्पादक, जानेफळ, जि. बुलडाणा
राज्यात सीताफळाचे एक लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र पोचले आहे. जंगली सीताफळ वेगळे आहे. शासनाने सीताफळाचे क्षेत्र निश्चित करावे, अशी सीताफळ महासंघ गेल्या पाच वर्षांपासून शासनाकडे मागणी करीत आहे. पण याला अद्याप यश आलेले नाही. यंदा दर आहेत तर माल नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
- श्याम गट्टाणी, अध्यक्ष, सीताफळ महासंघ पुणे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.