वर्धा ः जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव वाढला असतानाच पशुसंवर्धन विभागातील (Animal Husbandry Department) सहा अधिकाऱ्यांना सेवा देण्यासाठी इतर जिल्ह्यांत पाठविण्यात आले होते. हा प्रकार आमदार समीर कुणावार यांनी गंभीरतेने घेत त्यांनी पशुसंवर्धन विभागाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे हे सहाही अधिकारी आता जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
आधीच पशुसंवर्धन विभागात कर्मचाऱ्यांचा वाणवा आहे. त्यामुळेच ज्या जिल्हयात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव अधिक आहे अशा जिल्ह्यांमध्ये कमी प्रादुर्भावग्रस्त गावातील अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सुरुवातीला कमी प्रादुर्भाव असणाऱ्या जिल्ह्यात आता लम्पी स्कीनचा विस्तार होत असल्याचे निरीक्षण आहे. वर्धा जिल्ह्यात सुरुवातीला बाधित जनावरांचे प्रमाण कमी होते. आता मात्र १९२ गावे बाधित झाली आहेत. त्यामधील बाधित जनावरांची संख्या २१३२ इतकी आहे. उपचाराअंती बरी झालेल्या जनावरांचे प्रमाण १५८५ इतके असले तरी अद्याप आजारी जनावरे ३०७ आहेत तर १८० जनावरांना आपला जीव गमवावा लागला.
जिल्हयात येत्या काळात या कारणामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे असताना मुळ नेमणूक असलेल्या या जिल्ह्यातील पशुवैद्यकांच्या सेवा इतरत्र घेण्यात येत होत्या. आमदारांनी याबाबत विभागाकडून माहिती घेतली असता जिल्ह्यातील पशुधनाला वाऱ्यावर सोडत अधिकारी इतर जिल्ह्यांत सेवा देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आर्वी, देवळी, आष्टी, हिंगणघाट व वर्धा तालुक्यातील पशुवैद्यकांचा त्यामध्ये समावेश होता.
अनेक जनावरे लसीकरणापासून वंचित...
जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र अनेक जनावरे लसीकरणापासून वंचित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे २ लाख ७३ हजार १६० इतके लसीकरण कागदोपत्री झाल्याचा आरोप पशुपालकांमधून होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.