
जळगाव ः खानदेशात ऊसगाळपास (Sgarcane) गती आली आहे. सात कारखाने (Sugar Factory) गाळप करीत आहेत. पाच कारखाने सुरू आहेत. खानदेशात रोज सुमारे ३० हजार टन ऊसगाळप होत आहे. सध्या नंदुरबारमध्ये डोकारे (ता. नवापूर) येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना, समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील आयान शुगर व तळोदा तालुक्यातील श्रीकृष्ण शुगर मिल्स हे कारखाने सुरू आहेत.
धुळ्यात कुठलाही कारखाना सुरू नाही. जळगावात भोरस (ता. चाळीसगाव) येथे बेलगंगा कारखाना, चहार्डी (ता. चोपडा) येथे बारामती ॲग्रो आणि घोडसगाव (ता. मुक्ताईनगर) येथे मुक्ताई साखर कारखाना सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथील सातपुडा कारखाना लवकरच सुरू होईल. जळगाव जिल्ह्यात न्हावी (ता. यावल) येथे मागील तीन वर्षे बंद असलेला मधुकर कारखानादेखील सुरू करण्याच्या हालचाली आहेत.
समशेरपूर येथील आयान कारखाना सर्वाधिक प्रतिदिन नऊ हजार टन ऊसगाळप करीत आहे. इतर कारखानेदेखील वेगात गाळप करीत आहेत. खानदेशात आयान कारखान्याने आतापर्यंत अडीच लाख टन इतके सर्वाधिक गाळप केले आहे. त्यापाठोपाठ जळगावमधील बारामती ॲग्रो व मुक्ताई कारखान्यात ऊसगाळप होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात सुमारे १२ हजार हेक्टरवर ऊस आहे. धुळ्यातील शिरपूर, साक्री, जळगावमधील चोपडा, यावल, मुक्ताईनगर, चाळीसगाव या भागांत ऊस आहे. जळगाव जिल्ह्यात तुलनेने कमी ऊस आहे. परंतु गाळप व्यवस्थित सुरू आहे.
मध्य प्रदेशातूनही ऊस खरेदी
नंदुरबार जिल्ह्यातील काही कारखाने मध्य प्रदेशातूनही ऊस खरेदी करीत आहेत. तसेच धुळ्यातूनही नंदुरबारात ऊस पोहोचत आहे. यामुळे नगर, औरंगाबाद जिल्ह्यांतील कारखाने ऊस खरेदीसाठी जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत फारसे सक्रिय नसल्याचे दिसत आहे. फक्त धुळ्यातील साक्री भागातून नाशिकमधील कारखाने ऊस तोडणी किंवा खरेदी करीत असल्याची माहिती मिळाली. पाऊस आल्यास गाळपात व्यत्यय येऊ शकतो. काही कारखाने यंत्रांच्या मदतीने ऊसतोडणी करीत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.