
गडहिंग्लज : ‘‘तांत्रिक अडचणींमुळे यंदा गडहिंग्लज साखर कारखाना (Gadhinglaj Sugar Mill) बंद राहील. यामुळे तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या (Marginal Farmer) ऊसगाळपाचा (Sugarcane Crushing) प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी आजरा व चंदगड तालुक्यांतील कारखाना व्यवस्थापन, स्वाभिमानी संघटनेचे प्रतिनिधी व साखर सहसंचालकांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घ्यावी. तालुक्यातील ऊसगाळपाचा प्रश्न मार्गी लावावा,’’ अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली.
‘स्वाभिमानी’चे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना याबाबत निवेदन दिले. तालुक्यात दहा लाख टन उसाची उपलब्धतता आहे. ८० ते ९० टक्के उत्पादक अल्पभूधारक आहेत. उसाची रिकव्हरीसुद्धा चांगली आहे; परंतु या वर्षी साखर कारखाना बंद राहील.
यामुळे ऊसगाळपाचा प्रश्न गंभीर बनला आहे. आजरा साखर कारखान्यासह चंदगडमधील हेमरस, अथर्व शुगर (दौलत), इको-केन हे चार कारखाने गडहिंग्लजच्या कार्यक्षेत्रालगतच आहेत; परंतु या कारखान्यांकडून सध्या लांबच्या कर्नाटकातील उसाला प्राधान्य मिळत आहेत.
डिसेंबर महिना सुरू झाला आहे. अवकाळी पावसाने हंगाम लांबला आहे. त्यातच उसाला तुरे येत आहेत. परिणामी, वजन घटणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होईल. हा प्रश्न अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक आहे.
यामुळे चारही कारखान्यांचे कार्यकारी संचालक, मुख्य शेती अधिकारी, स्वाभिमानीचे प्रतिनिधी व प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घ्यावी. कर्नाटकातील उसाऐवजी जवळच्या कार्यक्षेत्रातील ऊस उचल करण्यावर भर देण्याची सूचना त्यात द्यावी, अशी मागणी ‘स्वाभिमानी’कडून करण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.