
अकोला ः रब्बी हंगामात (Rabi Season) पिकांचे सिंचन (Irrigation) करावे लागत असून सर्वत्र विजेची मागणी (Electricity Demand) वाढलेली आहे. वीज कंपनीकडून वीज वितरणाचे वेळापत्रक कधी दिवसा, तर कधी रात्रीचे असल्याने मोठी ओढाताण होत आहे.
रात्रीचा वीजपुरवठा सुरू असताना शेतकऱ्यांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागत आहे. दिवसभर राबल्यानंतर रात्री विजेमुळे जागरणाचा बाका प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवलेला आहे. सध्या अनेक शेतशिवारात शेतकरी जागरण करताना दिसून येत आहेत.
सध्या रब्बी पिकांची लागवड सर्वत्र झालेली आहे. या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी दिवसरात्र मेहनत करीत आहेत. गहू, हरभरा व इतर पिकांची ही वाढीची अवस्था आहे. अशा काळात पिकाला पाण्याचा ताण परवडणारा नसतो. त्यातच सध्या थंडीचा प्रकोपही वाढलेला आहे.
विजेचा पुरवठा आठवड्यात काही दिवस दिवसाला आणि काही दिवस रात्रीला राहतो. रात्रीचा पुरवठा गावांमध्ये वेगवेगळ्या वेळेनुसार केला जातो. अनेक गावांमध्ये तर मध्यरात्रीनंतर सुरू होऊन सकाळी बंद केला जातो. मध्यरात्री वीज येणार असल्याने शेतकऱ्यांना जागरणाशिवाय कुठला दुसरा पर्याय नाही.
गेल्या काही वर्षात जंगलांना लागून नसलेल्या शिवारांमध्ये वन्यप्राण्यांचे वास्तव्य वाढलेले आहे. बिबट, रानडुकरांचे हल्ले सातत्याने सुरू असतात. अशावेळी सिंचनासाठी रात्रीला जाणारा शेतकरी जीव धोक्यात घालून हे काम करीत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.