
नगर ः जिल्ह्यात पाऊस सतत (Rainfall) सुरू असला तरी काही ठिकाणी रब्बी ज्वारीच्या पेरणीला (Rabi Crop) सुरुवात झाली आहे. यंदा सरासरी ४ लाख ५८ हजार ६३६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. किमान सरासरी एवढ्या क्षेत्रावर पेरणीचा कृषी विभागाचा (Department Of Agriculture) अंदाज आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २ हजार ८६१ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात रब्बीत सर्वाधिक ज्वारीचे क्षेत्र असते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मात्र ज्वारीचे क्षेत्र झपाट्याने घटत आहे. मागील काही वर्षांत ज्वारीची साधारण चार लाख हेक्टरवर पेरणी होत होती. गेल्या वर्षी मात्र त्याच्या निम्मीही पेरणी झाली नाही.
यंदा कृषी विभागाने ज्वारीचे २ लाख ६७ हजार ८३४ हेक्टर सरासरी क्षेत्र निश्चित केले आहे. साधारणपणे काही भागांत ज्वारीची ऑगस्टमध्येच पेरणी होत असते. सध्या बहुतांश भागात सातत्याने पाऊस सुरू आहे.
तरीही आतापर्यंत रब्बी ज्वारीची २ हजार ८६१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा हरभऱ्याचे ८८ हजार ३७७, गव्हाचे ८६ हजार ४०५, मक्याचे १४ हजार ११८ हेक्टर सरासरी क्षेत्र निश्चित केले आहे.
वाफसा होताच येणार पेरण्यांना वेग
करडई, जवस, तीळ, सूर्यफूल या पिकांची पेरणीच होत नसल्याने सरासरी क्षेत्र कमी आहे. कांद्याच्या लागवडीलाही सुरुवात झाली आहे. आतापर्यंत २१ हजार २०० हेक्टरवर रब्बी कांदा लागवड झाली आहे. सततच्या पावसाने अनेक भागांत जमिनी चिबडल्या आहेत. पाऊस कमी झाल्यानंतर वापसा होताच रब्बीच्या पेरण्याला वेग येण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.