
Kolhapur News : ‘‘जिल्ह्यात खरिपाचे १ लाख ९२ हजार ६३६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. या महिन्यात २७ मिलिमीटर पाऊस झाल्याने जमीन मशागतीला उपयुक्त झाली आहे. साधारण २५ मेपासून जिल्ह्यात धूळ वाफ पेरणीला सुरुवात होईल,’’ अशी माहिती कृषी खात्याकडून देण्यात आली.
जिल्ह्यात पावसामुळे जमीन मशागतीसाठी उपयुक्त झाली आहे. जिरायत कोरडवाहू जमिनीवर बांधबंधिस्तीच्या कामाला वेग आला आहे. २५ मेपासून धूळ वाफ पेरणीला सुरुवात होईल. राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, करवीर व कागल तालुक्यांतील काही भागात पेरणीला सुरुवात होईल.
खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र सरासरी एक लाख ९२ हजार ६३६ हेक्टर आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भात, नागली, ज्वारी, मका, कडधान्ये, भुईमूग व सोयाबीन या प्रमुख पिकांचा समावेश आहे.
गत वर्षी खरीप हंगामामध्ये एकूण एक लाख ९४ हजार ५०० हे क्षेत्रावर पिकांची पेरणी झालेली होती. त्यातून चार लाख ५९ हजार टन अन्नधान्याचे व गळीत धान्य पिकांचे उत्पादन मिळाले.
२०२३-२४ करिता पीकनिहाय सर्वसाधारण क्षेत्र हेक्टर व उत्पादकता किलो प्रति हेक्टर पुढील प्रमाणे आहे. भात सर्वसाधारण ९६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे व ३ हजार ४६५ किलो प्रतिहेक्टरी उत्पादकता करण्याचे उद्दिष्ट कृषी खात्याने निर्धारित केले आहे.
नागली पिकाचे सर्वसाधारण २० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे व २ हजार किलो प्रति हेक्टरी उत्पादकता साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे.
१ लाख ८६ हजार २१५ हे क्षेत्रावर ऊस
कोल्हापूर जिल्ह्यात ऊस हे प्रमुख पीक आहे. २०२३-२४ करिता एकूण १ लाख ८६ हजार २१५ हे क्षेत्रावर ऊस पीक आहे.
त्याचप्रमाणे सरासरी १०६ टन प्रति हेक्टरी उत्पादकता मिळेल, असा अंदाज आहे. त्यानुसार एक कोटी ९७ लाख ३७ हजार टन उसाचे उत्पादन अपेक्षित आहे.
२०२२-२३ मध्ये एकूण १ लाख ७५ हजार ५६० हेक्टर क्षेत्रावरील ऊस पीक गाळपासाठी उपलब्ध झाले होते. सरासरी ९० टन प्रतिहेक्टरी उत्पादकता मिळाली आहे. त्यापासून एक कोटी ५८ हजार ४०० टन उसाचे उत्पादन झाले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.