
बार्शीटाकळी, जि. अकोला ः शेतात सोंगणी करून ठेवलेले सोयाबीनचे पीक दीड महिन्यापासून रस्त्याअभावी घरी आणणे जमत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. प्रशासनाकडे मागणी करूनही न्याय मिळत नसल्याने अखेरीस या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना शेतात ‘रोडगे पार्टीला या’ असे आमंत्रण दिले. याबाबत निमंत्रण पत्रिका बनवून समाज माध्यमांवर प्रसारितही केली आहे. किमान यामुळे तरी आता न्याय भेटेल, अशी अपेक्षा शेतकऱ्याला आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती बुद्रूक येथील शेतकरी विनोद मानकर यांनी शेतात गत दीड- दोन महिन्यांपासून सोयाबीन सोंगणी करून त्याचा ढीग लावलेला आहे. शेतात जाण्यासाठी असलेल्या शासकीय रस्त्यावर बाजूच्या शेतकऱ्याने अतिक्रमण करून तो रस्ता अडविल्याचा आरोप आहे. यामुळे मानकर यांना सोयाबीनचे पीक घरी आणता येत नाही. दोन महिन्यांपासून सोयाबीन पिकाच्या गंजीवरच ते दिवसरात्र मुक्कामी आहेत.
रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत त्यांनी तक्रार केली आहे. ७ एप्रिल २०२१ रोजी तहसीलदारांकडे रीतसर अर्ज केला होता. त्यानुसार तहसिलदारांनी २३ ऑक्टोबर २०२१ रोजी आदेश पारीत करून रस्ता देण्याचे स्पष्ट केले. याविरुद्ध संबंधित शेतकऱ्याने दिवाणी न्यायालयातून तहसीलदारांच्या आदेशावर मनाई हुकमाचा दावा दाखल केला. हा दावा न्यायालयात प्रलंबित आहे. परिणामी रस्त्याचा तोडगा निघालेला नाही. याचा फटका मानकर यांना बसत आहे. त्यांचे यंदाच्या खरिपातील सोयाबीनचे पीक शेतातच पडून आहे.
वांग्याच्या भाजीचा बेत
रस्ता नसल्याने सोयाबीन मळणीसाठी ट्रॅक्टर नेणे आवश्यक आहे. परंतु, संबंधित शेतकरी रस्त्याने जाण्यापासून अडवणूक करीत आहे. कोणत्याही अधिकाऱ्याने या शेतकऱ्याच्या त्रासाला समजून न घेतल्यामुळे मानकर आर्थिक व मानसिकदृष्ट्या त्रस्त झाले आहेत. यावर त्यांनी आता शक्कल लढवून सोयाबीनची गंजी पडून असलेल्या शेतातच गुरुवारी (ता.१५) खरपूस रोडगे व तर्रीदार वांग्याच्या भाजीचा बेत ठेवला. यासाठी थेट मुख्यमंत्री, शासकीय कर्मचारी व इतरांना जेवणाचे निमंत्रण दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.