Pune News : सोयाबीन आता राज्याचे मुख्य खरीप पीक बनले आहे. दरवर्षीच्या पेऱ्यातून सरासरी ४९ लाख टन सोयाबीन उत्पादित करण्याची क्षमता शेतकऱ्यांनी मिळविली आहे. कृषी विभागाने घरच्या बियाण्यांचा वापर करण्याबाबत सातत्याने घेतलेल्या अभियानाचा चांगला परिणाम झाला आहे. त्यामुळे गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी राज्याला ६६ लाख टन सोयाबीनचा पुरवठा केला आहे.
राज्याचा खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे कृषी विभागातील नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. यंदा भात, तूर, मका, सोयाबीन उत्पादनवाढीवर भर देण्यात येणार आहे. राज्यात खरिपाचे क्षेत्र १५२ लाख हेक्टरवर स्थिर आहे. मात्र, गेल्या हंगामात १५७ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. यंदा मात्र हाच पेरा १५८ लाख हेक्टरच्या पुढे नेण्याचा प्रयत्न कृषी विभागाचा आहे.
यंदाच्या खरिपात ७५ ते ७६ लाख टन सोयाबीनचे उत्पादन शक्य असल्याचे कृषी विभागाला वाटते. त्यासाठी किमान ४९ लाख हेक्टर पेरा अपेक्षित आहे. तसेच, उत्पादकता प्रतिहेक्टरी १५३८ किलोच्या पुढे गेली तरी उत्पादनाबाबत ठेवलेले उद्दिष्ट साध्य होऊ शकते.
राज्यात तुरीचा पेरा सरासरी १२ ते १३ लाख हेक्टरवर होतो. त्यातून सरासरी उत्पादन मात्र साडेबारा लाख टनाच्या आसपास होते. यंदा तुरीचा पेरा साडेबारा लाख हेक्टरच्या पुढे नेत उत्पादकता प्रतिहेक्टरी ११०० किलोच्या पुढे न्यायची व त्यातून १४ लाख टनाच्या पुढे तुरीचे उत्पादन न्यायचे, असे नियोजन कृषी विभागाने केलेले आहे.
खरिपात यंदा भाताचा पेरा १६ लाख हेक्टरच्या आसपास ठेवत ४१ लाख टनाच्या पुढे भाताचे उत्पादन नेण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. गेल्या हंगामात भाताचा पेरा साडे पंधरा लाख हेक्टरवर झाला होता. त्यातून ३४.५४ लाख टन भाताचे उत्पादन झाले होते.
राज्याची भात उत्पादनाची सरासरी क्षमता ३० ते ३१ लाख टनावर स्थिर झालेली आहे. मक्याचा पेरा यंदा ९ लाख हेक्टरच्या पुढे नेता येईल का, याचाही प्रयत्न कृषी विभाग करतो आहे. तसे झाल्यास व उत्पादकता हेक्टरी ३०८२ किलोच्या पुढे नेल्यास राज्यातून एकूण मका उत्पादन २८ लाख टनांच्या पुढे जाऊ शकेल, असे कृषी विभागाला वाटते. गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी मक्याचा पेरा पावणे नऊ लाख हेक्टरच्या पुढे नेला होता व उत्पादनदेखील २७ लाख टनांच्या पुढे घेतले होते.
थोडक्यात महत्त्वाचे...
- खरीप नियोजन अंतिम टप्प्यात
- यंदा भात, तूर, मका, सोयाबीनच्या उत्पादनवाढीवर ‘कृषी’चा भर
- खरीप पेरा १५८ लाख हेक्टरच्या पुढे नेण्याचा प्रयत्न कृषी विभागाचा प्रयत्न
- ७५ ते ७६ लाख टन सोयाबीनचे उत्पादन शक्य
- १४ लाख टनांच्या पुढे तुरीचे उत्पादन न्यायचे नियोजन
- ४१ लाख टनाच्या पुढे भाताचे उत्पादन नेण्याचे उद्दिष्ट
- मका उत्पादन २८ लाख टनांवर नेण्याचा प्रयत्न
अन्नधान्य उत्पादनाचे लक्षांक असा...
पिकांचे प्रकार—२०२२-२३ मधील स्थिती—-२०२३-२४ मधील उद्दिष्ट
क्षेत्र—उत्पादन—------- क्षेत्र–उत्पादन
तृणधान्ये ३०.९५–६८.५८—----------३३.५५—७९.८२
कडधान्ये १८.८४–१३.९७—----------२०.५३—१९.५८
गळितधान्ये ५१.०१–६८.०७—----------५१.३२—----७८.३२
ऊस १४.८८-१३५७—--------११.२०—---१०८६
कापूस ४२.२९–८४.१३—-----------४१.६८–८४.४७
(# कापूस उत्पादन लाख गाठीत असून एक गाठ १७० किलोची आहे.
# पिकांचे क्षेत्र लाख हेक्टरमध्ये तर उत्पादन लाख टनांत आहे.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.