
सातारा : शेतकऱ्यांना सुरू गळीत हंगामात पहिला हप्ता एकरकमी एफआरपी (FRP) एवढा आणि ऊसदर एफआरपी अधिक पाचशे रुपये द्यावा. साखर कारखान्यांनी (Sugar Mill) गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसदर जाहीर करावा, अन्यथा कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे (Sachin Nalawade) यांनी दिला.
श्यामगाव येथील ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. श्री. नलवडे म्हणाले, ‘‘मागील वर्षीची एफआरपी काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना अद्यापही दिलेली नाही. साखर कारखान्यांनी उपपदार्थातून जास्त उत्पन्न मिळवून उसाची रिकव्हरी कमी केली आहे.
त्यामुळेच शेतकऱ्यांना मागील वर्षीचा ऊसदर कमी मिळाला. मागील वर्षीचा साखर उतारा ग्राह्य धरून साखर कारखाने यापूर्वी आपला ऊसदर जाहीर करत होते; परंतु आघाडी सरकारमधील माजी सहकारमंत्र्यांनी हा निर्णय बदलला आणि ऊसदरासाठी चालू गळीत हंगामातील साखर उतारा ग्राह्य धरून ऊस दर द्यावा, असा निर्णय घेतला.
त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्या कारखान्याची एफआरपी किती हे कळणार नाही. त्यामुळे शेतकरी भरडला जाणार आहे. मागील वर्षीचा उतारा ग्राह्य धरला, तर शेतकऱ्यांना प्रतिटन आणखी शंभर ते दीडशे रुपये जास्तीचे मिळाले असते. पाच वर्षांत खते, बी- बियाणे, मजुरी, वीजबिल, डिझेल दर वाढल्याने मशागतीच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत.
त्यामुळे ऊस शेतीचा उत्पादन खर्च दुप्पट तिप्पट झाला आहे. गेल्या पाच वर्षांत ऊसदर मात्र दोन हजार आठशे रुपयांच्या जवळपासच आहे. शेतकऱ्यांना साखर कारखाने उपपदार्थातून मिळणाऱ्या फायद्याचा एक रुपया ही शेतकऱ्यांना देत नाही. जोपर्यंत कारखाने ऊसदर जाहीर करत नाहीत तोपर्यंत साखर कारखाने सुरू करू न देण्यात येणार नाहीत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.