
Chhatrapati Sambhaji Nagar मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाचही जिल्ह्यांत अनेक भागांत शनिवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अवकाळी पावसाचा वादळासह (Unseasonal Rain) जोर कायम होता.
त्यामुळे आंबा, मोसंबी, चिकू, अंजीर या फळपिकांसह काढणीच्या अंतिम टप्प्यातील रब्बी पिकांना व उन्हाळी पिकांची मोठी नासाडी झाली आहे.
कधी वादळासह तर कधी गारपिटीसह मराठवाड्यातील विविध भागांत पावसाचा कहर सुरूच आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात तर पावसाने कहरच केला आहे.
शनिवारी (ता.२९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी १८.३ मि.मी., जालना १२.६ मि.मी., बीड १४.९ मि.मी, लातूर १५.७ मि.मी., तर धाराशिव जिल्ह्यात सरासरी १४.२ मि.मी. पाऊस झाला.
पावसाचे रौद्ररूप छोट्या नद्या व ओढ्यांना आलेल्या पुरावरून पाहायला मिळाले. या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे होत्याचे नव्हते केले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी लाखो रुपयांच्या शेडनेटचीही पडझड झाली आहे.
पंचनाम्यांसाठी प्रशासन दखल घेईना
नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी दखल घेतली जात नसल्याची स्थिती आहे. सततच्या पावसामुळे शेतकरी धास्तावले आहेत. खरीप, रब्बी हंगाम बहुतांश हातचा गेल्याने त्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
खरीप, रब्बी नंतर आता उन्हाळी व फळ पिकांचीही होणारी हानी भरून काढण्यासाठी शासन तत्परतेने पुढे येईल का, शेतकऱ्यांना आधार देईल का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.