
Nashik News ः जिल्ह्यात शनिवार (ता. ४) दुपारपासून ढगाळ वातावरण (Cloudy Weather) तर मध्यरात्रीनंतर कसमादे भागात वादळी पावसाचा (Rainfall) तडका बसला.
यामध्ये प्रामुख्याने कळवण, सटाणा, देवळा व मालेगाव तालुक्यांचा समावेश आहे. कळवण तालुक्यात झालेल्या वादळ वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या टोमॅटो व हिरव्या मिरचीच्या लागवडी आडव्या (Crop Damage) झाल्या आहेत, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
शनिवारी (ता. ४) मध्यरात्रीनंतर पावसाची सुरवात झाली. कसमादे भागातील चारही तालुक्यांत हलक्या सरी बरसल्या. कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यांत ढगाळ वातावरण कायम होते.
सटाणा तालुक्यांतील उत्तर भागात काही ठिकाणी हलका पाऊस झाला. भुयाणे परिसरात एक ते दीड मिमी पाऊस झाल्याचे प्रगतिशील शेतकरी खंडेराव शेवाळे यांनी सांगितले.
कळवण तालुक्यात वादळ व पाऊस झाल्याने टोमॅटो, मिरची व कांदा पिकांचे नुकसान झाले. शनिवारी रात्री तीन वाजेपासून अधून मधून मेघगर्जना, ढगाळ वातावरण व सूर्योदयावेळी जमीन ओली होईल, अशा सरी बरसल्या. त्यामुळे रब्बी हंगामातील कांदा पिकावर करपा पडण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
चांदवड तालुक्यांच्या काही भागांत तुरळक हलका पाऊस झाला. मात्र ढगाळ वातावरण कायम होते. जिल्ह्यात प्रामुख्याने लेट खरीप कांद्याची काढणी झाली आहे.
अशा भागात पाऊस पडल्याने या कांद्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर जिल्ह्यात द्राक्ष काढणी हंगामाने गती घेतली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.
पहाटे तुरळक पाऊस झाला. प्रत्यक्षात नुकसान झाले नाही. मात्र चार-पाच दिवसांत कांदा पिकावर करपा रोग पडू शकतो. दर पडले असल्याने शेतकरी अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडला आहे.
- शिवाजीराव पवार, शेतकरी, वाखारी, ता. देवळा, जि. नाशिक.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.