
Nagar News : देशात अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यामुळे राज्यात वाया जाणारे पाणी (Waste water) वळवून ते पाणी नसलेल्या भागाला देण्याचे धोरण आखले आहे.
महसूल परिषदेतून जे निर्णय येतील त्यानुसार बदल केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी सांगितले.
लोणी (ता. राहाता) येथे दोनदिवसीय महसूल परिषदेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी (ता. २२) सुरुवात झाली.
या वेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमीमंत्री संदीपान भुमरे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे, राजेंद्र विखे, महसूल विभागीय सचिव नितीन करीर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, यांच्यासह राज्यातील बहुतांश जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व महसूल विभागीय यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की कोरोना, नैसर्गिक आपत्तीत महसूल विभागाचे काम महत्त्वाचे ठरले आहे. तसेच गूगल मॅपिंग, जिओ टॅगिंग या यंत्रणा अचूक काम करित आहे. सीलिंगच्या जमिनी भोगवटा वर्ग एक करण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत.
वाळूचे धोरण आणणेही महत्त्वाचे असून, त्यात सुटसुटीतपणा आला पाहिजे. गाळमुक्त धरणे, गाळमुक्त शेती, गाळमुक्त नदी, गाळयुक्त शेती करण्याची गरज आहे. महसूल विभाग ज्या नवीन योजना करत आहेत. त्याला सरकारचे पूर्णपणे समर्थन आहे.
कॅबिनेटमध्ये जो प्रस्ताव येतो, त्या वेळी तातडीने त्याला मंजुरी दिली जाते. देशात महाराष्ट्राचा महसूल विभाग एक नंबरवर आहे. महसूल विभागाला अनुभवी अधिकारी भेटले आहेत.
प्रशासकीय अधिकारी सरकारचा चेहरा
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की शासन आणि प्रशासन ही सरकारची दोन चाके असून, त्याची सांगड असणे गरजेचे आहे. त्यातून सामाजिक कायापालट होतो. तुमची प्रतिमा ही सरकारची प्रतिमा असते. लोकांत सरकारबद्दल चांगली भावना तयार करणे अधिकाऱ्यांच्या हातात असते.
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळतो. त्यामुळे लोकांना भेटणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांची जनतेशी संवाद साधण्याची जी पद्धत आहे, ती आदर्श निर्माण करणारी आहे. तुम्ही लोकांना जेवढे भेटाल तेवढी मंत्रालयातील गर्दी कमी होईल.
केंद्रात रेकॉर्ड ब्रेक जागा जिंकतील
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘देशातील जनता नरेंद्र मोदी यांच्यावर प्रेम करत आहे. देशातील अर्थव्यवस्था सात-आठ वर्षांत खूप उंचीवर नेली आहे. जी २० सारखी परिषद देशात पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. देशाला अध्यक्षपद मिळाले आहे.
जगामध्ये मोदी आजच्या लोकप्रियतेत नंबर एकला आहेत. लोक सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवण्याचे काम झाले आहे. सामान्य माणूस मुख्य प्रवाहात आला आहे. त्यामुळे आता होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक जागा जिंकून मोदी पुन्हा सत्तेवर येतील.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.