Farmer Issues : शेतकरी समस्यांवर पर्याय शोधण्यासाठी अभ्यासगट
नाशिक : ‘‘शेतकऱ्यांच्या समस्यांवर (Farmer Issues) पर्याय शोधण्यासाठी लवकरच अभ्यासगटाची स्थापन (Study Group) करण्यात येईल,’ अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली. कृषिमंत्री सत्तार हे शनिवारी (ता.१०) नाशिक जिल्हा कृषी महोत्सवास भेट देण्यासाठी नाशिक दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सत्तार म्हणाले, ‘‘राज्यात विदर्भ, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती व तेथील पीकपद्धती वेगवेगळ्या आहेत. तसे शेतकऱ्यांचे प्रश्नही वेगवेगळे आहेत. शेतमाल लागवड ते विक्री हे प्रमुख मुद्दे विचारात घेऊन क्षेत्रीय पातळीवरून आलेली संकलित माहिती, समस्या यांचा आढावा घेऊन त्यावर पर्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.
या समितीसाठी कृषी क्षेत्राचा अनुभव असणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांची चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात येईल.’’ ‘‘पीककर्ज, शेतीमालाला नसलेला भाव व सक्षम विक्री व्यवस्था हे प्रश्न आहेत. अतिरिक्त उत्पादन होते, त्यावेळेस शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नाही. परिणामी भाव कोसळतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.
अशा पार्श्वभूमीवर हमीभाव देणेही शक्य नाही. त्यामुळे क्षेत्रीय पातळीवरून शेतकऱ्यांचे प्रश्न विचारात घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी नवीन धोरण निश्चित करण्यात येईल,’’ असे सत्तार यांनी सांगितले.
‘निधी व मनुष्यबळ कमी’
‘‘राज्यातील उत्पादन स्थिती अभ्यासून मागणीनुसार पुरवठा होणे गरजचे आहे. मात्र अतिरिक्त उत्पादन होत असल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे यावर विचार विनिमय होणे गरजेचे आहे. शेतीमाल दरासंबंधी चढ-उतार अडचणीचे ठरतात. त्यावर क्षेत्रीय पातळीवर काम होणे महत्त्वाचे आहे. परंतु योजनेसाठी लागणारा निधी व मनुष्यबळ कमी पडत आहे,’’ अशी कबुली सत्तार यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.